पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या हंगामात ३८ कोटी लिटरने वाढणार आहे. त्यामुळे नव्या हंगामात एकूण इथेनॉल उत्पादन १५० कोटी लिटरच्या पुढे नेणे शक्य होईल, असा अंदाज साखर उद्योगातून व्यक्त करण्यात आला आहे.
साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशाची इथेनॉल निर्मिती गेल्या हंगामात ५० कोटी लिटरच्या आसपास होती. त्या तुलनेत महाराष्ट्राकडून ९० कोटी लिटरच्या पुढे इथेनॉल तयार केले जात आहे. राज्याच्या साखर उद्योगासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. राज्यात २०१९-२० मध्ये अवघे १८ कोटी लिटर इथेनॉल तयार झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच हंगामात म्हणजे २०२०-२१ मध्ये उत्पादन पाच पटीने वाढवले गेले. या अनुभवामुळे आता येत्या हंगामात आणखी ५० कोटी लिटर जादा इथेनॉल तयार करून एकूण उत्पादन दीडशे कोटींच्या पुढे नेण्याचा निश्चित करण्यात आले आहे.
राज्याची इथेनॉलनिर्मिती क्षमता २०२१-२२ मधील हंगामात जवळपास ३८ कोटी लिटरने वाढणार आहे. गेल्या हंगामात निर्मिती क्षमता १६४ कोटी लिटर असताना प्रत्यक्षात उत्पादन ९० कोटी लिटरच्या पुढे करता आले. आगामी हंगामात प्रकल्पीय निर्मिती क्षमता २०२ कोटी लिटरपर्यंत जाणार आहे.
परिणामी प्रत्यक्ष उत्पादन १५० कोटी लिटरच्या पुढे नेणे शक्य आहे. तसा विश्वास साखर उद्योगाला वाटतो आहे.
‘‘गेल्या हंगामात इथेनॉल निर्मितीमध्ये सहकारातील ४० आणि खासगी ३२ कारखाने सहभागी होते. येत्या हंगामात ५२ सहकारी, ५० खासगी तर स्वतंत्र (स्टॅंडअलोन) असे ४५ प्रकल्प इथेनॉल निर्मितीत उतरलेले असतील. गेल्या हंगामात तेल कंपन्यांना १०८ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले होते. प्रत्यक्षात करार ९५ कोटी लिटरचे झाले आणि जूनअखेर पुरवठा ६१ कोटी लिटरचा झाला होता. जून ते सप्टेंबरअखेरची माहिती संकलित झालेली नाही. तथापि, एकूण पुरवठा ९० कोटी लिटरच्या पुढे जाईल,’’ अशी माहिती साखर उद्योग सूत्रांनी दिली.
साखर कारखान्यांचे इथेनॉल खरेदी करणाऱ्या तेल विपणन कंपन्या (ओएमसी) आता कारखान्यांसाठी मुख्य आधार बनत आहेत. साखर कारखान्यांनी सी-हेव्ही मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलसाठी तेल कंपन्यांनी यंदा प्रतिलिटर ४५.६९ रुपये दर दिला. बी-हेव्ही मळीच्या इथेनॉलला ५७.६१ रुपये, तर ऊस रस किंवा साखर पाकापासून (केन मिक्स्ड ज्यूस, सिरप) तयार झालेले इथेनॉल ६२.६५ रुपये दर मिळाला. त्यामुळे तेल कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कारखान्यांना मिळाले आहेत. त्याचा वापर शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी केला जातो आहे.
इथेनॉलनिर्मितीत गेल्या दोन वर्षांपासून राज्याचा साखर उद्योग चांगली कामगिरी बजावतो आहे. ही कामगिरी पाहूनच आम्ही येत्या गाळप हंगामात राज्यात १५० कोटी लिटरपर्यंत इथेनॉल तयार करण्याची उद्दिष्ट ठेवले आहे. यात सर्वात चांगला भाग असा आहे, की इथेनॉलनिर्मितीतून कारखान्यांची आर्थिक उलाढाल वाढते आहे आणि त्यामुळेच वेळेत एफआरपी देण्याची क्षमता कारखान्यांना प्राप्त होते आहे. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.