अकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक शेतकऱ्यांना आपले अर्ज व हप्ता भरता आलेला नाही. यासाठी शासनाने पुन्हा काही दिवसांसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लाखपुरी पंचायत समिती गणाच्या सदस्य मिनल चंद्रकांत नवघरे यांनी शासनाकडे केली आहे.
याबाबत त्यांनी म्हटले की, मूर्तीजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कलसह जिल्ह्यातील असंख्य नागरिकांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत अर्ज भरता आले नाहीत. २५ जुलैपासून ऑनलाइन साईट सुरळीत सुरू नव्हती. त्यामुळे हजारो संख्येतील शेतकरी अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहिले आहेत. काही शेतकऱ्यांना पैसे नसल्यामुळे वेळेवर अर्ज सादर करता आले नव्हते. तर काही भागात विमा काढूनही गेल्यावर्षी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. पंतप्रधान पीकविमा योजनेचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैला रात्री १२ वाजता संपल्याने अनेक शेतकरी निराश झाले आहेत.
ज्यांनी अर्ज भरले त्यांनाही सातबारा प्रमाणीकरण करण्यास त्रास झाला. या सर्व बाबींचा विचार करता शासनाने पीकविमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी, असे मिनल नवघरे यांनी म्हटले आहे.
बुलडाण्यात माजी आमदारांचीही मागणी कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने नियम, अटी व वेळेच्या बंधनात न बांधता शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणे गरजेचे झाले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपली असून अद्यापही राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी किमान २० दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी म्हटले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संचारबंदी व सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांना पीकविमा उतरविण्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.