नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे भाजीपाला पिकांसह काढणीस आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. तर पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पेठ तालुक्यात सोमवारी (ता.३) हजेरी लावून आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यामुळे या भागातील २५ टक्के तयार होत असलेल्या कैऱ्या पडल्या. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
पेठ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत. त्यामध्ये केशर, हापूस, राजापुरी आंबा अधिक आहे. मात्र तालुक्यातील करंजाळी परिसराच्या १५ ते २० किलोमीटर परिसरात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तयार होत असलेल्या शेकडो एकर क्षेत्रावरील आंब्यांचे नुकसान झाले आहे.
काही अंशी या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडी केल्या आहेत. हा काढणीला आलेला कांदा पावसात भिजला आहे. यासह उन्हाळी बाजरी, भाजीपाला पिकांचे नुकसान अधिक आहे. दुपारी ३ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग कायम होता. या भागातील २५ टक्के आंब्याचे नुकसान झाल्याचे येथील प्रयोगशील शेतकरी यशवंत गावंडे यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.