महापूरबाधित शेतकऱ्यांची पीककर्जे होणार माफ

crop loan relief for flood-hit farmers
crop loan relief for flood-hit farmers

मुंबई : राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारने बुधवारी रात्री यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. 

या वर्षी राज्यातील विविध भागांत २६ जुलै आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा नागरिकांना मोठा फटका बसला होता. त्यापार्श्‍वभूमीवर सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागांतील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जुलै ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीच्या निर्णयानुसार एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पिकांना बॅंकेच्या निकषानुसार जे कर्ज दिले जाते, त्यानुसार हे कर्ज माफ करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांना शासनाच्या नुकसानभरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येणार आहे. 

अतिवृष्टिग्रस्तांना ६८ कोटींवर मदत

विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ६८ कोटी ९४ लाख २७ हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. श्री. वडेट्टीवार म्हणाले, की विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीककर्ज घेतले नाही, परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे व पुरामुळे किमान ३३% हानी झाली आहे, अशा शेतकऱ्यांना १ हेक्टरच्या मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार त्या त्या पिकासाठी, क्षेत्रासाठी अनुज्ञेय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

विदर्भातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना ६८ कोटी ९४ लाख २७ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीस मान्यता देण्यात आली आहे. २६ जुलै व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये पसरले होते. या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांना मदत देण्यात येणार आहे. कोरडवाहू पिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार एकूण २० हजार ४०० रुपये हेक्टर, आश्‍वासित सिंचनाखालील पिकांना ४० हजार ५०० रूपये हेक्टी तर बहुवार्षिक पिकांना ५४ हजार रूपये हेक्टरी अशी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचेही श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले. 

अशी मिळणार मदत

नागपूर ९ कोटी २१ लाख दोन हजार
वर्धा ३६ लाख ७१ हजार 
भंडारा ८ कोटी ३६ लाख ५४ हजार
चंद्रपूर २० कोटी ८१ लाख ६९ हजार
गडचिरोली ३० कोटी १८ लाख ३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com