नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) सायंकाळी कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात आवक होऊन दर कोसळले. परिणामी शेतकऱ्यांना कोथिंबीर तशीच बाजारातच सोडून घरी परतावे लागले. काही शेतकऱ्यांनी आणलेली कोथिंबीर पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेली. लिलावात कोथिंबिरीला अवघा एक रुपया जुडी असा भाव मिळाला.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओखी वादळामुळे मुंबईत शेतीमालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम दरावर झाला होता. मंगळवारी सकाळपासून ढगाळ हवामान व त्यातच पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने मंगळवारी शेतीमालाला कमी प्रमाणात उठाव असल्याने नाशिक बाजार समितीत दर घसरलेले होते.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई शहर, तसेच उपनगरांत दैनंदिन मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची निर्यात केली जात असते. मंगळवारी सायंकाळी मेथी भाजी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेली होती, परंतु मुंबईला पाऊस असल्याने तसेच शेतीमालाला उठाव नसल्याने मेथीला अपेक्षित दर मिळाला नाही. सध्या पालेभाज्या पिकासाठी पोषक हवामान तयार आहे. त्यामुळे कोथिंबिरीची आवक वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी सुमारे २७५ रुपये असा विक्रमी बाजारभाव गाठून सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या कोथिंबिरीचे बाजारभाव गुरुवारी पूर्णपणे घसरले.
चांगला बाजारभाव न मिळाल्याने कोथिंबीर उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून कोथिंबीर बाजार समितीत फेकून देत काढता पाय घेतला. नाशिकमधून मुंबईला कोथिंबीर माल रवाना करण्यात आला; मात्र पुणे, खेड, मंचर या भागांतील कोथिंबीर मुंबई बाजारात दाखल होत असल्याने, तसेच गुजरात राज्यातही स्थानिक कोथिंबीर दाखल होत असल्याने गुजरातमधील निर्यात थांबली आहे. परिणामी, उठाव कमी झाल्याने बाजारभाव कमी झाले होते.