नाशिक : मार्चअखेर विविध कारणे सांगून बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होण्यासह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ‘ॲग्रोवन’ने हा प्रकार समोर आणला होता. ही बाब पणन संचालनालयाने गांभीर्याने घेत बाजार समित्यांमध्ये तीन किंवा तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद राहणार नाही, या आशयाचे परिपत्रक काढले आहे. त्यातून पणन संचालक सतीश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांची कानउघाडणी केली आहे.
काही बाजार समित्या धार्मिक सण, उत्सव आणि जोडून आलेल्या साप्ताहिक सुट्ट्या यामुळे सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद ठेवतात. तर काही बाजार समित्यांमध्ये यात्रा, अमावास्या, व्यापाऱ्यांचा दौरा, आर्थिक वर्षअखेरचा दिवस, विवाह समारंभ तर ‘मार्च अखेर’ सांगून २ ते ३ दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी कामकाज बंद ठेवतात.
बाजार समित्या अधिक दिवस बंद राहिल्यामुळे शेतीमालाचे नुकसान, दरात घसरण यासह पुरवठा साखळीवरही परिणाम होतो. तर ग्राहकांना वाढीव दराने शेतीमाल खरेदी करावा लागतो. पुन्हा कामकाज सुरू होऊन आवक वाढून दर पडल्याने शेतकऱ्यांचेच नुकसान होते. लिलावाचे विनियमन व देखरेख करण्याचे बाजार समित्यांचे कर्तव्य असताना त्यास हरताळ फासत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे परिपत्रक काढून राज्यातील बाजार समित्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. हा आदेश व्यापाऱ्यांच्या संदर्भात असल्याने माथाडी व ट्रान्स्पोर्ट घटकाला पण यात समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांची असल्याचे समजते.
बाजार समित्यांना केलेल्या सूचना
जिल्हा उपनिबंधकांची मान्यता आवश्यक बाजार समितीने वर्षभराच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका, तहसील, पंचायत समिती यांचे कार्यालयासदेखील सूचित करण्यात यावे. बाजार समित्यांनी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ च्या सुट्ट्यांबाबत ३० एप्रिल २०२१ पर्यंत संबधित जिल्हा उपनिबंधक यांची मान्यता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कार्यवाहीबाबतचा जिल्हानिहाय अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दरवर्षी १० एप्रिलपर्यंत सादर करावा लागणार आहे.
बाजार समित्या या शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी असून कायद्याचे पालन करण्यास बांधील आहेत. जर त्यांनी सूचनांचे पालन केले नाही तर नियमनाच्या कायद्याने कारवाई करू. जर कुणाला यात त्रुटी वाटल्यास सूचना आल्यानंतर त्यास दुरुस्त्या करू. मात्र शेतकऱ्याच्या शेतीमाल विक्रीत अडचणी येणार नाही हे महत्त्वाचे राहील. अनेक बाजार समित्यांनी आठ दिवस कामकाज बंद ठेवले हे शासनाला मान्य नाही. - सतीश सोनी, पणन संचालक
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.