राज्यात थंडीचा कडाका कायम

cold
cold

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात वाढलेल्या थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. या थंडीने यंदाच्या वर्षाला निरोप मिळणार असून नववर्षाची सुरूवात होणार आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळी विदर्भातील चंद्रपूर येथे ५.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नीचांकी नोंद झाली आहे. 

हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यामध्ये बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट अजूनही कायम आहे. उत्तर भारताकडून मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या दिशेने थंड वाऱ्याचे प्रवाह वाहत आहे. दरम्यान राज्यात काही प्रमाणात असलेले कोरडे हवामानामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कडाक्याची थंडी वाढली आहे. या वाढलेल्या थंडीमुळे चालू वर्षाला निरोप मिळणार असल्याने वर्षाच्या अखेरीस ऊब मिळविण्यासाठी राज्यातील अनेक भागात शेकोट्या पेटल्या आहेत. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मध्य महाराष्ट्रात धुळे कृषी महाविद्यालय आणि विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या भागात थंडीचा कडाका कायम आहे. अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांश भागात थंडी वाढली असून किमान तापमानाचा पारा चांगलाच खाली आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात ऊन आणि ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, तुरळक ठिकाणी कोरडे हवामान असल्याने उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे किंचित थंडी आहे. सध्या ऊन पडत असल्याने ढगाळ हवामानाची स्थिती निवळत आहे. मात्र, संध्याकाळी काही प्रमाणात गारठा जाणवत आहे. कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई या परिसरात थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे या भागात २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मध्य महाराष्ट्रासह, खान्देशातही ढगाळ हवामानामुळे गारठा कमी अधिक स्वरूपात आहे. तर धुळे कृषी महाविद्यालयात दोन दिवसापासून सर्वांत कमी तापमान नोंदविले जात आहे. उर्वरित भागात किमान तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानाची स्थिती असली तरी थंड वाऱ्यामुळे किंचित गारठा आहे. यामुळे किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस या दरम्यान होते. 

दरम्यान, उत्तर प्रदेशाच्या मध्य भागात चक्राकार चक्राकार स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. आज (ता. ३१) मराठवाडा व विदर्भात किमान तापमानात चढउतार सुरू असून, विदर्भात व मध्य महाराष्ट्रात वाढलेली थंडी पुन्हा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यातच पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  रविवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासातील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला १३.१, अलिबाग २१.१ (३), अमरावती १०.८ (-३), औरंगाबाद १४.१ (३), बुलडाणा १३.० (-१), चंद्रपूर ५.७ (-८), डहाणू १७.४, गोंदिया ५.८ (-६), जळगाव १३.४ (२), कोल्हापूर २०.१ (४), महाबळेश्वर १३.९ (१), मालेगाव १२.१ (२), मुंबई २०.२ (३), नागपूर ६.५ (-६), नांदेड १२.०, नाशिक १२.८ (३), निफाड १३.१, धुळे कृषी महाविद्यालय ६.६, उस्मानाबाद १२.१ (-१), परभणी १२.९, परभणी कृषी विद्यापीठ १२.६, लोहगाव १६.८ (५), पाषाण १६.५ (५), पुणे १५.८ (५), रत्नागिरी २२.३ (३), सांगली १९.३ (५), सातारा १७.१ (४), सोलापूर १८.६ (३), ठाणे २२.०, वर्धा ९.८ (-३), यवतमाळ १३.४ (-१).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com