जळगाव : राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदा पाच लाख ३० हजार हेक्टरवर कापूस लागवड होईल, त्यासाठी बीटी कापूस बियाण्याची किमान २५ लाख पाकिटे आवश्यक आहेत, तसेच सुमारे एक लाख सरळ वाणांची पाकिटे आवश्यक असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात कापसाखालील क्षेत्र सर्वाधिक असते. एकूण आठ लाख हेक्टरवर खरीप हंगाम असतो. ९० ते ९२ टक्के कापूस उत्पादक शेतकरी बीटी कापसाची लागवड करतात, असे गृहीत धरून बीटी कापसाच्या किमान २५ लाख पाकिटांची आवश्यकता यंदाही जिल्ह्यात असणार आहे. गेल्या हंगामात सुमारे २३ लाख पाकिटांची गरज भासली होती. त्यात काही विशिष्ट वाणांचीदेखील अधिक मागणी असते, त्याची कृत्रीम टंचाईदेखील तयार केली जाते.
हा प्रकार थांबविण्यासाठी संबंधित कंपन्यांनादेखील सूचना दिल्या जाणार आहेत. खरिपाची तयारी काही दिवसात वेगात सुरू होईल. जिल्ह्यात तापी, गिरणा, वाघूर नदीच्या लाभक्षेत्रात मे महिन्याच कापूस लागवडीवर भर दिला जातो. पण गुलाबी बोंड अळीला अटकाव करण्याच्या उद्देशाने गेले दोन वर्षे बियाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध केले जात आहे. यामुळे पूर्वहंगामी कापूस लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते.
रावेर, यावल, जामनेर, पाचोरा, चोपडा आदी भागात केळी पीक असते. केळी पिकासाठी चांगले बेवड म्हणून या भागात पूर्वहंगामी सरळ कापूस वाणांची लागवडही केली जाते. या भागात किमान एक लाख सरळ वाणांच्या पाकिटांची गरज असणार आहे.
पण जिल्ह्यात गेले दोन वर्षे सरळ वाणांचा पुरवठा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात केला जातो. देखील पुरेसा नसतो. यामुळे काळाबाजार, परराज्यातून खरेदीचे प्रकार होतात, ही बाब लक्षात घेता सरळ वाण पुरवठादार कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा करून घेण्याचे नियोजनही कृषी यंत्रणा करीत असल्याची माहिती मिळाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.