माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा उसाची एफआरपी एकरकमी देण्याबाबत अद्याप निर्णय जाहीर केला नाही. परंतु त्या त्या वर्षाच्या साखर उताऱ्याच्या आधारे ‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार दिल्यास व्याजात मोठी बचत होऊन शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळू शकतात. या धोरणामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना प्रतिटन तीनशे रुपये अधिकचे मिळतात. या बाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. अर्थात, या सकारात्मक बाबींचा गांर्भीयाने विचार शेतकरी संघटनांसह सभासदांनी केला पाहिजे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ६५व्या गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने साखरेचे दर वाढीस लागले आहेत. महाराष्ट्रातील कारखानदारांनी या स्थितीचा आतापासून विचार करावा. यापुढे साखरेबरोबर आता इथेनॉल, वीजनिर्मिती करण्याचे अचूक धोरण कारखांदारांनी राबविले पाहिजे. साखर उत्पादन खर्चाच्या तुलनेत केंद्राने साखरेची किमान आधारभूत किंमत वाढविली नाही. केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपयांवरून ३६०० रुपयांपर्यंत केंद्राने वाढवावी. कारखानदारांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी व्याजाचा मोठा भुर्दंड सोसावा लागतो.’’ माळेगाव कारखाना विरोधकांच्या ताब्यात असताना मोठे अर्थिक नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. विस्तारीकरणात यंत्रसामग्री निकृष्ट बसविल्याने साखर उतारा घसरला, डिस्टिलरी, विजेचे उत्पन्न घटले, कर्जाचा बोजा वाढल्याने शेतकऱ्यांना गेली दोन वर्षे कमी दर मिळाला. परंतु बाळासाहेब तावरेंच्या संचालक मंडळाने मागील दीड वर्षात कर्जाची परतफेड करीत कारखाना सुस्थितीत आणला आहे. त्यामुळे माळेगाव यापुढे ऊस दराच्या बाबतीत सोमेश्वरसह अग्रगण्य ऊसदराची बरोबरी करेल, असा विश्वासही पवार यांनी बोलून दाखविला. माळेगावने पाच कोटी रुपये खर्च करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी प्लांट) उभा केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये होणारे प्रदूषण थांबले आहे. अर्थात, कारखान्याच्या निवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द खरा केल्याचे पवार यांनी आवर्जून सांगितले. तत्पूर्वी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी आपल्या भाषणात प्राप्तिकर विभागाच्या नोटिसाचा मुद्दा उपस्थित करीत पवारांचे याकडे लक्ष वेधले. तसेच त्यांनी गतवर्षी विक्रमी १२ लाख ६८ हजार गाळप करून साखर उतारा ११.७५ टक्के इतका मिळविल्याने पुढील वर्षाची एफआरपी प्रतिटन २ हजार ७८० पर्यंत जाईल, असे सूचित केले. या वेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, मदनराव देवकाते, तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, केशवराव जगताप, अनिल तावरे, सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
विरोधी संचालकांचा प्रवेश माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमधून निवडून आलेले संचालक प्रताप जयसिंग आटोळे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अर्थात, हा प्रवेश अचानक जाहीर झाल्याने सभास्थानी एकच खळबळ उडाली. आटोळे यांनी विरोधी पार्टीचे संचालक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांना रामराम करीत पवारांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे विरोधी पार्टीत आता गुलाबराव गावडेंसह तीन संचालक उरले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.