परभणी ः भारतीय रेल्वेतर्फे परभणी येथून यंदा प्रथमच २ हजार ६६१ टन सोयाबीन सोमवारी (ता.१५) मालगाडीव्दारे गुजरात मधील गांधीधाम येथे पाठविण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना विविध राज्ये, विदेशात शेतमाल पाठविण्याची संधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बनवलेल्या बिझनेस डेव्हलेपमेन्ट युनिट (बी.डी.यु.) ला चांगले यश प्राप्त होत आहे. नगरसोल येथून किसान रेल्वेने कांदा आणि द्राक्षे देशभरात पाठविण्यात येत आहेत. मराठवाडा विभागात सोयाबीनचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेण्यात येते. आजवर सोयाबीनची जिल्ह्याबाहेर रस्ते मार्गे ट्रक, टेम्पो आदी वाहनाव्दारे वाहतूक केली जात असे. भारतीय रेल्वेने आता शेतमाल वाहतूक वाढविण्यावर अधिक भर दिला आहे.
मालगाडीत शेतमाल चढविणे, उतरणे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे मालवाहतूक अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे होत आहे. त्यातच नव्यानेच स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेन्ट युनिट (बी.डी.यु. चे अधिकारी विविध क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक,शेतकरी यांच्या भेटी घेऊन त्यांना रेल्वे मालवाहतुकीचे फायदे, महत्त्व पटवून देत आहेत. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मालवाहतूक वाढविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.