हापूसची १०५ टन निर्यात

हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गेले काही दिवस पणन, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
hapus
hapus

रत्नागिरी ः हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गेले काही दिवस पणन, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. मुंबईतील वाशी मार्केटमधील पाच कंटेनरमधून सुमारे १०५ टन हापूस समुद्रमार्गे संयुक्त अरब अमिराती आणि ओमानला रवाना झाला आहे. आंबा बागायतदारांसाठी ही दिलासादायक गोष्ट ठरली आहे. कोरोनामुळे देशासह परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम शेतमालासह विविध प्रकारच्या फळांच्या निर्यातीला खो बसला होता. ऐन हंगामात ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले होते. सुमारे पाच ते दहा टक्के आंबा तयार झाला असून त्याची विक्री कशी करायची, असा प्रश्‍न होता; मात्र गेल्या आठ दिवसात शेतमाल वाहतुकीला मिळालेली परवानगी बागायतदारांसाठी उपयुक्त ठरली. त्यामुळे बागांमधील तयार आंबा किमान बाजार समित्यांपर्यंत पोचवणे शक्य होऊ लागले आहे. त्यानंतर पणन मंडळ, कृषी विभाग, आत्मा यासह काही खासगी व्यापाऱ्यांनी हापूसच्या विक्रीसाठी थेट ग्राहकांपर्यंत साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.  हापूस विक्रीचे वाशी हे सर्वात मोठे केंद्र आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये कोकणामधून सुमारे २२ हजार पेट्या वाशीत दाखल झाल्या. हा माल विक्री कुठे करायचा हा प्रश्‍न होता. त्यादृष्टीने आखाती देशांमधील निर्यातीला चालना देण्यासाठी हालचाली सुरु होत्या. त्याला अखेर यश मिळाले. समुद्रमार्गे शुक्रवारी (ता. ४) पाच कंटेनर मुंबईतून रवाना झाले. त्यातील चार कंटेनर संयुक्त अरब अमिरातीला तर एक कंटेनर ओमानला जाणार आहे. या दोन्ही देशांना पुरवण्यात आलेला माल निर्यातदारांमार्फत पाठविला गेल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले. एकूण १०५ टन आंब्याची निर्यात सुरु झाल्यामुळे वाशीत साठा होणार नाही.  निर्यातीला झालेली सुरवात आंबा बागायतदारांना दिलासा देणारी ठरु शकते. १२ एप्रिलनंतर मोठ्याप्रमाणात आंबा दाखल होणार आहे. सध्या मालाला ग्राहक नसल्यामुळे दर पडलेले आहेत. पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत पेटीला दर मिळत आहे. निर्यातीला पाठवलेल्या आंब्यालाही माफक दर मिळाला आहे.  आत्मामार्फत ४४० पेटी साताऱ्यात उपविभागीय कृषी अधिकारी जी. बी. काळे यांच्यासह राजापूर तालुका कृषी अधिकारी जगताप यांच्या प्रयत्नातून राजापूर आणि रत्नागिरीतील सुमारे ४४० आंब्याच्या पेट्या आत्माच्या माध्यमातून कराड, सातारा, फलटणला शनिवारी रवाना झाल्या आहेत. शेतकरी ते थेट ग्राहक अशी यंत्रणा आत्माच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com