खतांचा ऱ्हास रोखण्यासाठी कॅनडामध्ये संशोधन सुरू

खतांचा ऱ्हास रोखण्यासाठी कॅनडामध्ये संशोधन सुरू
खतांचा ऱ्हास रोखण्यासाठी कॅनडामध्ये संशोधन सुरू

कोणतीही गोष्ट योग्य वेळी योग्य ठिकाणी झाल्यास त्याचे निष्कर्ष उत्तम मिळतात, ही सर्वमान्य बाब खतांच्या वापराबाबत एकदम सत्य आहे. खतांचा वापर पिकांच्या वाढीच्या योग्य टप्प्यामध्ये करण्याविषयी सातत्याने अभ्यास होत असतो. कॅनडा येथील संशोधकांचा गट शेतकऱ्यांसाठी खतांचे योग्य ते मिश्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल क्वालिटी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. जेव्हा शेतकरी खते देतात, तेव्हा ती जमिनीमध्ये राहून पिकांना उपलब्ध होत राहतील, अशा विश्वास असतो. मात्र, शेतातून वाहून, निचरा होऊन जाणाऱ्या पाण्यासोबत दिलेल्या खतापैकी मोठा भाग जातो. कॅनडामध्ये पाणी दोन प्रकारे नुकसान करते. त्यात पावसाचे पाणी आणि पडलेला बर्फ वितळून होणारे पाणी असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही बाबींचा विचार करून खतांचा ऱ्हास रोखण्यासाठी कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ सॅस्कट्चेवान येथील जेफ श्चोईनाऊ आणि त्यांचा गट प्रयत्न करत आहे. जेफ श्चोईनाऊ म्हणाले की, आम्ही प्रामुख्याने स्फुरदयुक्त खतांच्या कार्यक्षम वापरासाठी संशोधन करत होतो. उत्तरेकडील भागामध्ये खते दिल्यानंतर होणारा ऱ्हास मोठा आहे. तो कमी करून पिकांसाठीची त्याची उपलब्धता वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे.

  • योग्य जागा ः खते देण्यासाठी सामान्यतः मातीच्या वरील थरामध्ये देण्याचा मार्ग अवलंबला जातो. मातीमध्ये थोड्या अधिक खोलीवर खते देताना सरीमध्ये बियाण्यांसोबत किंवा त्याच्या लगतच्या सरीमध्ये खत दिले जाते. सामान्यतः खते मातीवर देऊन नंतर मातीमध्ये मिसळण्याची शिफारस केली जाते.
  • योग्य प्रमाण ः वेगवेगळ्या प्रमाण किंवा दराने मातीच्या वरील भागामध्ये किंवा गाडून खते देऊन त्याचा अभ्यास केला. त्यातील मातीमध्ये गाडून दिलेली स्फुरदयुक्त खते पिकांना दीर्घकाळ उपलब्ध होतात. तसेच बर्फ वितळून वाहणाऱ्या पाण्यासोबत त्यांचा कमी ऱ्हास होत असल्याचे दिसून आले.
  • स्फुरद हे पिकांच्या वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यामध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. ते मातीच्या विश्लेषणानुसार विविध प्रकारामध्ये वापरले जाते. माती स्फुरदयुक्त खत वापरल्यानंतर विविध मूलद्रव्ये आणि सेंद्रिय घटकांसोबत त्याची प्रक्रिया सुरू होते. त्यातून ते पिकांना उपलब्ध होईल, अशा स्वरूपामध्ये येते. हे अर्थात चांगले असले तरी पुढे हे खत वाहत्या किंवा निचरा होणाऱ्या पाण्यासोबत भूजल किंवा नाले, ओढे आणि नद्यांमध्ये जाते. मातीमध्ये आणि पाण्यामध्ये या खतांचे मूळ प्रकार जाणून त्यानुसार ते टिकवून ठेवण्यासाठी तंत्र शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मातीच्या पृष्ठभागामध्ये मिसळण्याऐवजी पिकांच्या मुळाद्वारे जेथून खत उचलले जाणार आहे, तिथेच ते पुरवण्याचा प्रयत्न आवश्यक आहे.
  • बर्फाच्या वितळण्यामुळे तयार झालेला अपधाव (वाहते पाणी) हे उन्हाळी पावसापेक्षा वेगळे असते. पावसाच्या वेगामुळे मातीचे स्फुरदयुक्त कण मोकळे होतात. मात्र, बर्फाच्या वाहत्या पाण्यामध्ये हळूहळू विरघळून खते पाण्यासोबत वाहतात. या दोन्ही प्रक्रियांना अटकाव करण्यासाठी योग्य त्या पद्धतींचा शोध घेतला जात असल्याची माहिती श्चोईनाऊ यांनी दिली. या अभ्यासातून नव्या पीकपद्धतीसोबतच व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com