सोलापूर ः पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्जपरतफेडीसाठी दिलेली ६० दिवसांची मुदत संपल्याने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई अटळ मानली जात आहे. त्यामुळे यंदा साखर कारखाना सुरू होण्याची आशा मावळली आहे. कारखान्याने विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प, डिस्टिलरी प्रकल्प आदींसाठी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष भारत भालके यांनी राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी ३४१ कोटी रुपये आणि अन्य बँकांकडून सुमारे ८६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण यंदा कारखान्याचा हंगाम सुरू होऊन काही तरी मार्ग निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु विद्यमान अध्यक्ष भगीरथ भालके आणि संचालक मंडळ त्यासाठी फारसे काही करू शकले नाही. त्यातच २३ सप्टेंबरला कर्जवसुलीसाठी राज्य बँकेने नोटीस बजावली होती. त्यात ६० दिवसांची कर्जपरतफेडीची मुदत दिली होती. पण या कालावधीत कारखाना प्रशासनाकडून काहीच हालचाली होऊ शकल्या नाहीत. आता तर ही मुदत संपल्याने आणि कारखानाही सुरू न झाल्याने कारखान्यावरील जप्तीची कारवाई अटळ मानली जात आहे. ही कारवाई झाल्यास पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांबाबत अधिक दुर्दैवाची बाब मानली जात आहे. ताकद कमी पडली गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक कारखान्यांची थोड्याफार फरकाने अशीच अवस्था आहे. पण त्यात्या कारखान्याच्या संचालक मंडळ आणि प्रशासनाने मोठे प्रयत्न केले. पंढरपुरातील वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनीही राज्य बँक आणि सरकारकडे पाठपुरावा करून यंदा कारखाना सुरू केला. पण विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके यांचे प्रयत्न अपुरे ठरल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मदतीसाठी प्रयत्न केले. तसेच कारखाना सुरू करण्याबाबत सूचनाही संचालक मंडळांना दिल्या. पण त्या सर्व फोल ठरल्या. मुख्यतः भालकेंची ताकद कमी पडल्याचे बोलले जाते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.