Solapur Tomato Market: पावसाचा खंड पडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मोडनिंबच्या टोमॅटो बाजारपेठेत दररोज सुमारे ६२५ टनांपेक्षाही जास्त टोमॅटोची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रति किलो ४० ते ५५ रुपयांपर्यंत विकल्या गेलेल्या टोमॅटोला यंदा केवळ ५ ते ६ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. .टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बाजारापर्यंत टोमॅटो विक्रीसाठी नेण्याचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांकडून जनावरांना टोमॅटो खायला घातला जात आहेत..मोडनिंब परिसरात रस्त्यालगत उभारलेल्या खासगी शेडमधून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. सुमारे २० ते २५ व्यापारी येथे टोमॅटोची खरेदी करतात. सध्या दररोज सुमारे २५ हजार क्रेट टोमॅटोची आवक होत आहे. एका क्रेटमध्ये २५ किलो टोमॅटो धरल्यास ही आवक तब्बल ६ लाख २५ हजार किलो, अर्थात ६२५ टन होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवक होत असतानाही बाजारात मालाला अपेक्षित उठाव नसल्याने दराला आधार मिळत नसल्याचे चित्र आहे..Tomato Market : लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलाव सुरू.एका क्रेटमध्ये २५ किलो टोमॅटो भरले जातात. त्यातून नाटा म्हणून एक किलो आणि क्रेटचे वजन म्हणून एक किलो असे दोन किलो वजन वजा केले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला प्रत्यक्ष २३ किलो टोमॅटोचे पैसे मिळतात. सहा रुपये किलो भाव गृहीत धरला, तरी एका क्रेटचे १३८ रुपये मिळतात..त्यातून वाहतुकीचे २५ रुपये आणि हमालीचे १० रुपये वजा केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात अवघे १०३ रुपये राहतात. म्हणजे वाहतूक व हमाली वजा केल्यानंतर प्रत्यक्ष सुमारे ४ रुपये ४८ पैसे किलो मिळतात. त्यातून तोडणीसाठी सुमारे दोन रुपये किलो आणि उत्पादनासाठी झालेला खर्च दोन रुपयांपेक्षा अधिक आहे..Tomato Price Crash: टोमॅटो उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले.महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा खंड पडल्याने उष्णता वाढली. त्यामुळे टोमॅटोचा माल लवकर पिकला आणि बाजारातील आवक वाढली. त्याचवेळी कर्नाटकातील बंगळूर व कोलार मार्केट परिसरातही यंदा टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. महाराष्ट्रातील टोमॅटो दिल्ली, राजस्थान आणि गुजरातच्या बाजारपेठेत जातो. बंगळूर व कोलार परिसरातील टोमॅटोही याच बाजारपेठांमध्ये जात आहे. त्यामुळे या बाजारपेठांमध्ये दोन्ही राज्यांतील मालाची एकाच वेळी आवक होत असल्याने महाराष्ट्राच्या टोमॅटोला उठाव कमी झाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने दरात कमालीची घसरण झाल्याचे व्यापारी सांगतात..गेल्या वर्षी टोमॅटोला प्रति किलो सुमारे ४० ते ५५ रुपये इतका चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना एकरी सहा ते सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले होते..सध्या टोमॅटोची आवक जास्त होत आहे. येथे दररोज सुमारे २५ हजार क्रेट टोमॅटोची आवक होत आहे. मालाला उठाव नसल्यामुळे टोमॅटोचे दर पडले आहेत.कैलास चव्हाण, अडत दुकानदार, गिड्डेवाडी, ता. मोहोळ.मागणीपेक्षा माल जास्त असल्याने दरावर दबाव आहे. विशेषत: गुलटी टोमॅटोला ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.अमित कोळी, अडत दुकानदार, मोडनिंब.गेल्या वर्षी टोमॅटोला ४० ते ५५ रुपये किलोपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे एकरी सहा-सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा मात्र ५-६ रुपये किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो पीक तोट्यात गेले आहे.शिवाजी व्यवहारे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, रोपळे बुद्रुक, ता. पंढरपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.