Buldhana : जिल्ह्यात हमीभाव खरेदीला (MSP Procurement) सुरुवात होऊन एक महिनाही पूर्ण झालेला नाही. तोच उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने पोर्टल बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा हरभरा सध्या पडून आहे. शिवाय खरेदी केलेल्या हजारो क्विंटल हरभऱ्याच्या नोंदीसुद्धा रखडल्याने खळबळ उडाली आहे.
शासनाच्या पुढाकाराने १५ मार्चपासून जिल्ह्यात नाफेडने हरभरा खरेदी सुरू केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांत अनेक ठिकाणी ६० पेक्षा अधिक केंद्रे सुरू केली.
महिन्याच्या आतच उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने रविवारी (ता. ९) अचानक खरेदी थांबवण्यात आली. केंद्रांवर मोजमाप झालेल्या वाहनांच्या नोंदी पोर्टलवर करण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न केले तर उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा संदेश दिसून येत होता.
राज्यात ८१ लाख क्विंटल खरेदीचा लक्ष्यांक आहे. त्यापैकी बुलडाणा जिल्ह्यात ६ लाख ५८ हजार क्विंटल खरेदी झाली आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील हरभरा खरेदीच्या नोंदी थांबविल्या. पोर्टलवरून या जिल्ह्याच्या नव्याने नोंदी आता होणार नाहीत.
एकूण उत्पादकतेच्या २५ टक्के खरेदी -
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याला मिळालेले खरेदीचे उद्दिष्ट हे एकूण उत्पादित हरभऱ्याच्या २५ टक्के आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात याच निकषानुसार खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.
खुल्या बाजारात हरभरा अवघा चार ते साडेचार हजारांदरम्यान विकत आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रांवर अवलंबून आहेत. नोंदणीकृत एकूण शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचाच हरभरा खरेदी होऊ शकलेला आहे.
अजूनही ५० ते ६० टक्के शेतकरी प्रतीक्षेत आहेत. खरेदीच थांबविल्याने राहिलेल्यांचे काय, असा प्रश्न आहे. हा निकष तातडीने बदलून खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.