Amravati News : मॉन्सूनोत्तर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाच्या परिणामी अवेळी ताण तुटल्याने लिंबाचा हंगाम लांबला आहे. त्यामुळे बाजारात लिंबाच्या दरात चांगलीच तेजी आली आहे. दर तब्बल दहा हजार रुपये क्विंटलवर पोचले आहेत. एप्रिलपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नजीकच्या काळात दर १२ हजार ५०० रुपयांवर पोचतील, अशी शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली आहे.
अमरावती जिल्ह्यात सुमारे २५० हेक्टरवर लिंबाची लागवड आहे. त्यातील सर्वाधिक ८० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या नांदगाव खंडेश्वर परिसरातील माऊली (चोर) परिसरात आहे. या भागातून विदर्भातील प्रमुख बाजारात लिंबाचा पुरवठा होतो. त्यासह अकोला जिल्ह्यातील वाडेगाव भागातही लिंबाच्या बागा आहेत.
ही दोन गावेच लिंबाचे प्रमुख उत्पादक आणि पुरवठादार आहेत. आंबिया आणि हस्त बहारातील लिंबू फळांची उपलब्धता फेब्रुवारीपासून होते. परंतु, यंदा नोव्हेंबरमध्ये झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे हा हंगाम लांबला. या हंगामातील लिंबू फळे आता थेट एप्रिल महिन्यात उपलब्ध होतील, अशी माहिती लिंबू बागायतदार अंकुश झंझाट यांनी दिली.
किरकोळ दर सरासरी १२० रुपये किलो
तापमानात वाढ झाल्याने ग्राहकांकडून लिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळेच बाजारात लिंबाचे दर तेजीत आले आहेत. महिन्याच्या सुरवातीला ४००० ते ६००० रुपयांचा दर लिंबाला असताना आता हे दर थेट १० हजार रुपये क्विंटलवर पोचले आहेत.
किरकोळ बाजारात तर यापेक्षा अधिक दराने लिंबे विकली जात आहेत. सरासरी १२० रुपये किलोने लिंबाचे व्यवहार होत आहेत. नागपूरच्या कळमना बाजारात सध्या २० क्विंटल इतकी अत्यल्प आवक असून या ठिकाणी देखील दर ५००० ते ९००० रुपयांवर पोचले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.