Pune News : खरिपापाठोपाठ रब्बी कांदाही शेतकऱ्यांची निराशा करत आहे. सध्या बाजारात आवकेचा दबाव आहे. दर उत्पादन खर्चापेक्षा कमीच दिसतात. पण यंदा एप्रिल आणि मे महिन्यात पावसाचा कांदा पिकाला फटका बसला.
रब्बी कांद्याची टिकवणक्षमता कमी झाली. त्यामुळेच बाजारात आवक जास्त दिसते. पण ऑगस्ट महिन्यापासून कांदा आवक कमी होऊ शकते. तर ऑक्टोबर ते डिसेंबर का काळात टंचाईसुद्धा जाणवू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात सध्या कांद्याचे भाव दबावात आहेत. रब्बी कांदा आवकेचा दबाव बाजारावर दिसत आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या पावसाचा कांदा पिकाला फटका बसला.
काढणीला आलेला कांदा पावसात सापडला. तर काही ठिकाणी काढणी केलेला कांदा भिजला. कांद्याला पाणी लागल्याने गुणवत्तेवर परिणाम झाला. या कांद्याची टिकवणक्षमता कमी झाली. परिणामी हा कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. यामुळे बाजारात काद्यांची आवक दाटली. याचा दबाव दरावर आला.
देशांतर्गत बाजारात भाव पडल्यानंतर निर्यात आवश्यक असते. भारताच्या सरासरी गुणवत्तेच्या कांद्याचे मुख्य ग्राहक बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ हे देश आहेत. पण बांगलादेशला सध्या निर्यात बंद आहे, याचा फटका बसत आहे, असे कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी सांगितले.
यंदा हंगामाच्या शेवटपर्यंत कमी कांदा टिकू शकतो. सध्या बाजारावर आवकेचा दबाव आहे. पण ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून आवकेचा दबाव दूर होऊन आवक कमी होऊ शकते.
तर हंगामाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये बाजारात कांदा टंचाई भासू शकते. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कांद्यांची उपलब्ध कमी होऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
रब्बीत राज्यात राहिले ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र
रब्बी हंगामात यंदा देशात ११ लाख २० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. त्यापैकी महाराष्ट्रात ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र होते, असे जाणकारांनी सांगितले. यंदा कांद्याला पावसाचा फटका बसल्याने टिकवणक्षम कांद्याची उपलब्धता कमी दिसते. म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळापर्यंत टिकेल असा कांदा केवळ ३० टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे शेतकरी आणि अभ्यासकांनी सांगितले.
निर्यातक्षम मालाला ८०० ते १२०० रुपये दर
एप्रिल महिन्यात बाजारात येणाऱ्या कांद्याची टिकवणक्षमता कमी होती. त्यामुळे हा कांदा वाहतुकीसाठी वापरता येत नव्हता. म्हणजेच गुणवत्ता कमी होती. म्हणून भाव घसरले होते. पण मे महिन्यात कांद्याची गुणवत्ता सुधारत गेली. आता गुणवत्तापूर्ण कांदा बाजारात येत आहे.
त्यामुळे कमी गुणवत्तेच्या कांद्याला सध्या ६०० ते ७०० रुपये भाव मिळत आहे. तर निर्यातक्षम मालाला ८०० ते १२०० रुपयांचा भाव मिळत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. पण सध्याही बाजारात कांद्याची आवक जास्तच दिसते. नाशिक, सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही बाजारांमध्ये कांदा आवक सरासरीपेक्षा अधिक आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.