
सांगली ः राजस्थान, गुजरात या राज्यांतील डाळिंबाचा हंगाम (Pomegranate Season) सुरू झाला आहे. महाराष्ट्रात या दोन्ही राज्यांतील डाळिंबाची आवक (Pomegranate Arrival) फारशी झाली नसल्याने राज्यातील डाळिंब उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दर (Pomegranate Rate) टिकून आहेत. सध्या उच्च दर्जाच्या डाळिंबाला प्रति किलोस १५० रुपये असा दर मिळत आहे, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील डाळिंब महाराष्ट्राच्या बाजारपेठेत दाखल झाले होते. त्यामुळे राज्यातील डाळिंबाच्या दराला त्याचा फटका बसला होता. परिणामी दरात घसरण झाली होती. यंदाच्या हंगामात डिसेंबर महिन्यात डाळिंबाची आवक होईल, अशी शक्यता डाळिंब संघाने वर्तवली होती. परंतु डिसेंबर महिन्यात फारशी आवक झाली नसल्याचे चित्र आहे. मुंबई बाजारपेठ वगळता इतर कोणत्याही बाजारपेठेत आवक झाली नाही.
गुजरातमध्ये २० हजार तर राजस्थानमध्ये १५ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी दोन्ही राज्यातील शेतकरी अंबिया आणि हस्त बहराकडे वळाले आहेत. त्यामुळे मृग हंगामातील डाळिंबाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. यामुळे महाराष्ट्रात मृग हंगामातील डाळिंबाची आवक घटली आहे.
देशातील मृग बहरातील डाळिंबाचा हंगामास गती आली आहे. व्यापारी देशभरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जावून डाळिंबाची खरेदी करत असल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता राज्यात सर्वाधिक डाळिंबाचे क्षेत्र असून यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच डाळिंबाचे दर टिकून राहिले आहेत.
देशात यंदा मृग बहार ४० ते ४५ हजार हेक्टरवर धरला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून डाळिंबाचा हंगाम सुरू झाला आहे. देशात आज अखेर २५ टक्के हंगाम आटोपला आहे. बाजारपेठेत डाळिंबाला चांगली मागणी असून उठाव देखील होत आहे. त्यामुळे यंदा हंगाम लवकर संपेल, अशी शक्यता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
निर्यात घटणार
देशातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यंदा पावसाचा तडाखा सहन करावा लागला आहे. त्यामुळे डाळिंबावर तेलकट रोगासह कुजव्याचा प्रादुर्भाव झाला असल्याने रेसीड्यू फ्री दर्जेदार डाळिंबाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे निर्यातीसाठी अपेक्षित असे डाळिंब शेतकऱ्यांच्या हाती येत नाही. परिणामी युरोपसह आखाती देशात निर्यात घटणार आहे. परंतु बांगलादेशला निर्यात वाढेल, अशी शक्यता आहे.
परराज्यातून डाळिंबाची आवक कमी असल्याने राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. मात्र, यंदाच्या हंगामात युरोपसह आखाती देशात डाळिंबाची निर्यात कमी होईल. दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.
- प्रभाकर चांदणे,
अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
हंगाम दृष्टिक्षेपात...
- देशात २५ टक्के हंगाम आटोपला
- युरोपसह आखाती देशात डाळिंबाची निर्यात घटणार
- डाळिंबाची मागणी वाढली
- दर टिकून राहण्याची शक्यता
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.