Pomegranate Export : सततच्या नैसर्गिक आपत्तींचा डाळिंब निर्यातीत ‘खोडा’
सोलापूर ः सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural calamity) डाळिंबाच्या क्षेत्रवाढीवर (Pomegranate Acreage) या आधीच परिणाम झाला आहे. त्यात आता उत्पादनातील घटीसह गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच निर्यातीचा हंगामही (Pomegranate Export Season) साधारण दोन महिने पुढे जाईल, असे सध्याचे चित्र आहे. अर्थात, या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करता-करता स्वतःची आर्थिक घडी बसवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मात्र नाकीनऊ येणार आहे.
देशातील एकूण डाळिंब उत्पादनात सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. एकट्या महाराष्ट्रात एक लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब विस्तारले आहे. निर्यातीतही महाराष्ट्राचीच आघाडी आहे. मृग, हस्त आणि अंबिया या तीन बहरांमध्ये डाळिंब उत्पादन घेतले जाते.
परंतु अलीकडच्या दोन-तीन वर्षांत डाळिंबावरील खोडकीड, तेलकट रोग आणि मरसारख्या रोगामुळे सोलापूरसह सांगली, नाशिक, पुणे, नगर हा डाळिंब पट्टा काळवंडून गेला आहे. सुमारे ४० टक्क्यांपर्यंत बागा गेल्या आहेत. नव्याने होणारी लागवड अगदीच बोटावर मोजण्याइतपत आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी बहर बदलले, पण रोगराईचे चित्र काही बदललेले नाही. त्यात यंदा सततच्या पावसाची भर पडली आहे. महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे.
युरोप बाजार हातचा जाणार
साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत युरोप बाजार शेतकऱ्यांना उपलब्ध होतो. मार्चनंतर भारताशी स्पर्धा करणाऱ्या स्पेन, इराण, इराकची डाळिंबे बाजारात येतात. त्यामुळे त्या आधी भारतीय डाळिंब या बाजारात पोहोचावी यासाठी महाराष्ट्रासह देशात मृग बहरात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
या हंगामात देशात ३५-४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर डाळिंब उत्पादन घेतले जाते. पण यंदा सततचा पाऊस आणि कीड-रोगामुळे त्यापैकी ५० टक्के क्षेत्रावरील डाळिंब उत्पादन आधीच घटले आहे. आता उरल्या-सुरल्या क्षेत्रावरील डाळिंबाला पुन्हा पावसाचा फटका बसला आहे. त्यात एकरी उत्पादकता, गुणवत्ता ही कमीच मिळणार आहे. त्यामुळे युरोप बाजार मिळेल का, याबाबत शंका आहे.
देशांतर्गत बाजाराची संधी
गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार डाळिंबाला युरोपीय बाजारपेठेची सर्वाधिक पसंती मिळते. तिथे दरही चांगला मिळतो. तर दुसऱ्या प्रतीच्या डाळिंबाला बांगलादेशासह अरब देशांची बाजारपेठ मिळते. मागच्या हंगामातही केवळ गुणवत्तेअभावी भारतीय डाळिंबाची अरब देशांमध्ये विक्री झाली. तीही जेमतेम ३० ते ३५ हजार टनांपर्यंत निर्यात झाली.
यंदा ही पुन्हा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा किमान ५ ते १० हजार टनापर्यंत तरी निर्यात होईल की नाही, याबाबत शंका आहे. तसेच देशातच सध्या डाळिंबाचे दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांपेक्षाही अधिक आहेत. शिवाय सध्याची डाळिंबाची उपलब्धता पाहता, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एकमेव संधी शेतकऱ्यांना आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.