
जळगाव ः खानदेशात पपईची आवक (Papaya Arrival) स्थिर आहे, पण मागणी वाढली असून, दरात सुधारणा (Papaya Rate) झाली आहे. सध्या प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) पपईची आवक होत आहे.
पपईचे दर १० दिवसांपूर्वी नऊ ते १० रुपये प्रतिकिलो असे जागेवरच किंवा थेट शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु उत्तर भारतात थंडी वाढली आहे. तसेच राज्यासह इतरत्र थंडीचे आगमन झाले आहे. यामुळे मागील काही दिवसांत पपईदरात सुधारणा झाली असून, थेट खरेदीत १२ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.
पपई काढणी सध्या वेगात सुरू आहे. जानेवारीत खानदेशात पपईची मोठी आवक होते. याच काळात उठावही असतो. पपईची पाठवणूक सध्या दिल्ली, हरयाना, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात केली जात आहे.
पपईदरांवरून मध्यंतरी शेतकरी व खरेदीदार यांच्यात वाद निर्माण झाले होते. त्याबाबत नंदुरबारात शेतकरी व खरेदीदार यांच्यात बैठकही झाली होती. त्यात बैठकीत तोडगा निघाला. पुन्हा दरात घसरण झाली. परंतु मागणी किंवा उठाव वाढल्याने दरात सुधारणा झाली आहे.
पपईची सर्वाधिक आवक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे होत आहे. तेथे खानदेशातील एकूण आवकेतील ६० टक्के पपईची काढणी होत आहे. यापाठोपाठ धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर या भागांतही पपईची बऱ्यापैकी आवक होत आहे.
पपईला थंडी कायम राहिल्यास उठावही असणार आहे. उत्तर भारतात पपईचे उत्पादन होत नसल्याने तेथून सुरुवातीपासून मागणी आहे. पुढे आवक कमी होईल आणि उठावही राहील. परिणामी पपईदरात सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.