Orange Import Duty : संत्रा आयात शुल्क प्रकरणात बांगलादेशकडून असहकार्य

Orange Market : संत्रा आयात शुल्कात बांगलादेशने केलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर ढाका येथील भारतीय उच्चायुक्‍तामार्फत हा मुद्दा बांगलादेश सरकारसोबत लावून धरण्यात आला आहे.
Orange
Orange Agrowon
Published on
Updated on

Amravati News : संत्रा आयात शुल्कात बांगलादेशने केलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर ढाका येथील भारतीय उच्चायुक्‍तामार्फत हा मुद्दा बांगलादेश सरकारसोबत लावून धरण्यात आला आहे.

त्यासोबतच ५ जानेवारीपासून विविध व्यासपीठांवर देखील या मुद्यावर बांगलादेश सरकारसोबत चर्चा केली जात असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

नागपुरी संत्र्याचा बांगलादेश हा सर्वांत मोठा आयातदार आहे. राज्याच्या एकूण पाच लाख टन उत्पादनांपैकी सुमारे दीड ते दोन लाख टन संत्र्याची बांगलादेशला निर्यात होते. उर्वरित संत्रा देशांतर्गत विकला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत बांगलादेशने संत्रा आयात शुल्कात सातत्याने वाढीचे धोरण अवलंबिले आहे.

Orange
Orange Import Duty : बांग्लादेशकडून संत्रा आयात शुल्कात २५ रुपयांची वाढ

२०१९ मध्ये प्रति किलो २०, आणि २०२० मध्ये ३०, आणि २०२१ मध्ये ५१, तसेच २०२२ मध्ये ६३ त्यानंतर आता थेट प्रति किलो ८८ रुपये आयात शुल्क आकारण्यात आले आहे. याच्या परिणामी बांगलादेशमध्ये संत्र्याचे दर सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जातील.

परिणामी, मागणी कमी होत त्याचा निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र संत्रा उत्पादक असोसिएशनने केंद्रीय वाणिज्य मंत्रालय तसेच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहीत या विषयात हस्तक्षेपाची मागणी केली होती.

Orange
Orange Import : संत्रा आयात शुल्कप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या उपसंचालक निधी पांडे यांनी या पत्राला दिलेल्या उत्तरानुसार, बांगलादेशच्या ढाका स्थित भारतीय उच्चायुक्‍तांमार्फत हा मुद्दा बांगलादेश सरकारकडे मांडण्यात आला आहे.

पाच जानेवारी २०२३ पासूनच या संदर्भाने विविध पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. त्याकरिता बांगलादेश सरकारचे प्रतिनिधी असलेल्या विविध व्यासपीठावर देखील हा मुद्दा मांडण्यावर भर दिला गेला आहे.

भारत सरकार ५ जानेवारी २०२३ पासून हा मुद्दा ढाका येथील भारतीय उच्चायुक्‍तांमार्फत बांगलादेश सरकारसमोर मांडत आहे. परंतु बांगलादेश सरकारने त्याची कोणतीच दखल घेतली नाही. आंबिया बहराचा हंगाम सप्टेंबरपासून सुरू होत जानेवारी, फेब्रुवारी असा राहतो. त्यापूर्वी या समस्येवर समाधान शोधणे गरजेचे आहे. अन्यथा, संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. भारत सरकारने राजकीय दबावतंत्राचा अवलंब करण्याची गरज आहे.
- ॲड. धनंजय तोटे, अध्यक्ष, महाराष्ट्र ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com