
Chhatrapti Sambhajinagar News : ‘‘भारतात सरकी ही सर्वाधिक उत्पादन होणारी तेल बी असली तरी त्यावरील प्रक्रिया उद्योग अजूनही पारंपरिक पद्धतीने चालवला जात आहे. या उद्योगाचे आधुनिकीकरण केल्यास अधिक प्रमाणात खाद्यतेलाचे उत्पादन होईल.
त्यातून मूल्यवर्धनाबरोबरच देशाची खाद्यतेल आयात कमी करून परकीय चलन वाचवणे देखील शक्य होईल,’’ असे मत खाद्यतेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील शिखर संस्था ‘द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे (एसईए) अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.
एसईए आणि दि ऑल इंडिया कॉटनसीड क्रशर्स असोसिएशन (एआयसीओएससीए) तर्फे आयोजित चौथ्या दोन दिवसीय ‘कॉटनसीड ऑइल कॉन्क्लेव्ह-२०२३’ च्या उद्घाटन समारंभात शुक्रवारी (ता. ७) ते बोलत होते.
श्री. झुनझुनवाला म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने चालविलेल्या ‘तेलबिया मिशन’ अंतर्गत २०३० पर्यंत देशातील खाद्यतेल उत्पादन वाढवून आयात सध्याच्या ६०-६५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकीच्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे.
भारतात दरवर्षी खाद्यतेलाची मागणी भागवण्यासाठी सुमारे ७० टक्के म्हणजे १४०-१५० लाख टन तेल आयात केले जाते. यातून मोठे परकीय चलन खर्च केले जाते.’’
‘‘देशांतर्गत तेलाचे उत्पादन शंभर लाख टन एवढेच होत आहे. देशाची लोकसंख्या दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढत आहे तर खाद्यतेल वापर तीन टक्क्यांनी वाढत आहे. देशात खाद्यतेलाचा दरडोई वापर सुमारे १७ किलो असून हे प्रमाण शेजारील देशांपेक्षाही कमी आणि विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी किमान १० लाख टन अतिरिक्त खाद्यतेलाची गरज भासते. त्यामुळे खाद्यतेलाच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्यासाठी मोहरी, भुईमूग आणि पामचे एकरी उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल,’’ असेही झुनझुनवाला म्हणाले.
‘‘देशात मोठ्या प्रमाणात जीएम कापूस बियाण्यांचा पेरणीसाठी वापर होत आहे. त्यामुळे उत्पादकतेत क्रांती झाली आहे. आता, मानवी वापरासाठी हानिकारक असलेल्या गॉसिपॉलपासून मुक्त असे जीएम सुधारित कापूस बियाणे वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. यामुळे आपल्या देशाची प्रथिनांची गरज भागण्यास मदत होईल.
जीएम कापूस बियाणे वापरल्याने तणामध्ये कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले गॉसिपॉल असते. परंतु ते सरकी मध्ये उतरत नाही. यामुळे याचे तेल मानवीसेवनासाठी योग्य ठरते.
तसेच प्रक्रिया करताना निर्माण होणारे क्रश कुकुटपालन आणि मत्स्य व्यवसायासाठी सर्वात किफायतशीर पशुखाद्य म्हणून वापरता येते,’’ असेही झुनझुनवाला यांनी सांगितले. परिषदेला देशभरातून कापूस बी (सरकी) मूल्यसाखळीशी संबंधित ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.