
1. देशातील बाजारात आज कापसाचे भाव स्थिर दिसले. तर कापसाची आवकही स्थिर होती. वायद्यांमध्ये कापूस दरात आज काहीशी नरमाई दिसली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज ८५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील वायदे ६०० रुपयांनी कमी होऊन ५९ हजार ६०० रुपयांवर पोचले. बाजारांमध्ये कापसाला आजही सरासरी ७ हजार ते ७ हजार ६०० रुपये भाव मिळाला. पुढील काळात कापसाची आवक आणखी कमी होऊन दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव काहीसे वाढले होते. सोयाबीनचे वायदे १३.६५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड वायद्यांनी अनेक दिवसानंतर ४०४ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनची दरपातळी ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. सोयाबीनवर सध्या दबाव असल्याने भावपातळीत काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
3. बाजारात सध्या कारली आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. मात्र कारल्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे कारल्याचे भाव तेजीत आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक या बाजारांमध्ये कारल्याची आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. परिणामी कारल्याला सध्या प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. कारल्याचे भाव पुढील काळातही तेजीतच राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
4. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये गव्हाने आता २ हजार रुपयांचा टप्पा पार केला. सरकारने यंदा देशातील गहू उत्पादन वाढल्याचा अंदाज दिला. पण व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांना हा अंदाज मान्य नाही. खुल्या बाजारात दर वाढल्याने सरकारला ३४३ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्टही गाठता आले नाही. त्यामुळे सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ९०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. गव्हाच्या दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
5. कांद्याचे भाव सध्या उत्पादन खर्चापेक्षा कमीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला. तर कांद्याची टिकवणक्षमताही कमी झाली. एरवी पाच ते सहा महीने कांदा टिकत होता. पण यंदा बहुतांशी कांद्याची टिकवणक्षमता ३ महीन्यांपेक्षा जास्त नसेल. पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा कांद्यावर परिणाम झाला. परिणामी हंगामाच्या शेवटी कांद्याची टंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाजारात येणाऱ्या कांद्याची गुणवत्ता हळूहळू चांगली येत आहे. तर दुसरीकडे आवकेचा दबावही कमी होताना दिसतोय. परिणामी पुढील काळात आवक आणखी कमी होऊ शकते. त्यातच बांगलादेशने कांदा आयातीवर निर्बंध काढले. यामुळे निर्यातीला गती मिळू शकते.
नाफेडही तीन लाख कांदा खरेदी करणार आहे. या बाजू कांदा बाजाराला आधार देऊ शकतात. मागील तीन दिवसांमध्ये दरात काहीशी सुधारणा दिसली. पण कांदा दराची सरासरी दरपातळी ८०० ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. बाजारावरील कांदा आवकेच्या लोंढ्यामुळे शिल्लक मालही कमी झाला. त्यामुळे पुढील काळात कांदा बाजाराला चांगला आधार मिळू शकतो.
दोन महिन्यानंतर बाजारातील कांदा आवक कमी दिसू शकते. तर ऑक्टोबरपासून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहू शकतो. त्यामुळे कांदा भावात चांगली सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.