1. कापसाची भावपातळी टिकून
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने देशातील बाजारातही दराला आधार मिळाला. कापसाच्या भावात आजही काही बाजारांमध्ये क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. चीन आणि इतर महत्वाच्या मार्केटमधून मागणी वाढल्यामुळे कापसाचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव टिकण्याची शक्यता असल्यानेच देशातही भावात सुधारणा झाली आहे. कापसाचे भाव देशातील बाजारात ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. दरात आणखी सुधारणा होण्यास अनुकूल स्थिती आहे. पण अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीचाही परिणाम होऊ शकतो, असे अभ्यासकांनी सांगितले.
2. जिऱ्याचे दर तेजीत
देशात जोरदार पावसामुळे जिऱ्याचे उत्पादन कमी झाले. पण देशांतर्गत बाजारात मागणी चांगली असल्याने जिऱ्याच्या भावात चांगली तेजी आली आहे. जिऱ्याचे वायदे एनसीडीईएक्सवर ६० हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव ५४ हजारांच्या दरम्यान राहत आहे. जिऱ्याला निर्यातीसाठीही मागणी चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्याचाही आधार जिऱ्याला मिळत आहे. यामुळे जिऱ्याचे भाव आणखी काही महिने तेजीर राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
3. धन्याचे बाजारभाव वाढले
मसाले बाजाराताली तेजी धन्यापर्यंत पोचली. धन्याला मागील काही महिन्यांपासून चांगली मागणी आहे, सध्या पिकाला पोषक वातावरण नाही आणि पुरवठा कमी आहे. या सर्व घटकांमुळे धने बाजारात तेजी आली. धने निर्यातही जोमात सुरु आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत धन्याची निर्यात तीन पटीने वाढली. यामुळे वायद्यांमध्ये धन्याच्या भावाने ८ हजारांचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमध्ये ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. धन्याचे भावही पुढील काळात तेजीत राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
4. कारल्याला चांगला उठाव
राज्यातील बाजारात कारल्याची आवक खूपच कमी होत आहे. त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत. पावसामुळे पिकाचे नुकसान वाढल्याने आवकेवर परिणाम झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. आवक कमी असली तरी मागणी मात्र टिकून आहे. त्यामुळे कारल्याला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. कारल्याच्या दरातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदजा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
5. भारताच्या आयातीचा काय परिणाम होऊ शकतो?
भारत जगातील सर्वात मोठा आयातदार आहे. चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर भारतात आयात वाढली. जुलै महिन्यातही देशात मोठी आयात होण्याची शक्यता आहे. देशात सणांचा काळा तोंडावर आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा मतभेद झाल्याने सूर्यफुल तेलांच्या उपलब्धतेविषयी अनिश्चितता आहे. यामुळे देशात रिफायनरी उद्योग चालू महिन्यात आयातीवर जोर देत आहे. देशात चालू महिन्यात जवळपास १९ लाख टन खाद्यतेल आयात होण्याचा अंदाज आहे. खाद्यतेल डिलर्स आणि कार्गो सर्वेक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलैपर्यंत देशातील विविध बंदरांवरून जवळपास १५ लाख टन खाद्यतेल देशात आले. तर उर्वरित ७ दिवसांमध्ये आणखी जवळपास ४ लाख टन खाद्यलेलाला जुलै महिन्यात क्लिअरन्स मिळू शकते.
भारताची खाद्यतेल आयात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दराला आधार देणारी ठरु शकते. पामतेलाचे दर आधीच मागील साडेचार महिन्यांपासून वाढलेले आहेत. त्यालाही आधार मिळेल. तसेच रशियाला सूर्यफुल तेलाचा स्टाॅक कमी करण्याची संधी मिळेल. पण भारताची आयात वाढल्याचा लाभ सोयातेलालाही मिळू शकतो. सोयातेलाचे भाव मागील काही दिवसांपासून वाढलेले आहेत. त्यात पुढील काळातही सुधारणा दिसू शकते. याचा आधार सोयाबीनलाही मिळू शकतो. सध्या सोयाबीनचे भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयातेल सुधारल्यास सोयाबीनही सुधारु शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.