
१) कापूस दरात काहीशी सुधारणा (Cotton Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दराने मागील दोन महिन्यांतील निचांकी दराची पातळी गाठली. शुक्रवारी कापसाचे वायदे ७७.५८ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले. तर देशात कापूस उत्पादनात मोठी घट आल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे कापसाचे दर मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागं १०० ते १५० रुपयाने सुधारले. कापसाला सध्या सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळतोय.
सध्या दरावर आवकेचा (Cotton Arrival) दबाव असून आवक मर्यादीत झाल्यास दरात आणखी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीन दर जैसे थेच (Soybean Rate)
देशात सोयाबीनची दरपातळी मागील एक महिन्यापासून कायम आहे. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत.
सोयाबीनचे वायेद शुक्रवारी १४.७६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंड ४६५ डाॅलर प्रतिटनावर होते. देशातून सध्या सोयापेंड निर्यात सुरळीत सुरु आहे. त्यामुळं सोयाबीन दराला आधार असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
३) तुरीच्या दरातील तेजी कायम
चालू आठवड्यात तुरीच्या दरातील तेजी कायम होती. तुरीला चालू आठवड्यात सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळाला. शेतकरी तुरीची विक्री मर्यादीत करत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काही ठिकाणी गरजेपेक्षाही कमी माल मिळतोय.
मात्र उठाव चांगला आहे. त्यामुळे दरातील तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) लिंबाला उठाव वाढतोय
सध्या दिवसा उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाचे वातावरण आहे. पण मध्ये चांगलाच उकाडा जाणवतो. त्यामुळे बाजारात लिंबाला मागणी वाढली. त्यामुळे लिंबाला दरही चांगला मिळतोय.
सध्या लिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तर पुढील काळात उन्हाचा चटका वाढल्यानंतर लिंबाला आणखी उठाव मिळेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
५) सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय?
देशातील महत्वाच्या हरभरा उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पावसाचा दणका बसत आहे. यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक २९ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतो.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातच देशातील एकूण हरभरा लागवडीपैकी निम्मे क्षेत्र आहे. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात हरभऱ्याखाली जास्त क्षेत्र आहे. राज्यात ५० टक्के हरभरा काढणी पूर्ण झाली असून जवळपास ५० टक्के हरभरा शेतातच आहे.
मागील तीन दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या हरभरा उत्पादक भागांमध्ये पाऊस होतोय. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मध्य प्रदेशातही पावसाने पिकाचे नुकसान केले.
ज्या शेतकऱ्यांनी हरभरा काढला त्यांनी यंदा उत्पादकता २० टक्क्यांनी घटल्याचे सांगितले. त्यातच पावसाने दणका दिला. त्यामुळे उत्पादकतेतील घट जास्त होणार आहे. त्यामुळे हरभरा बाजारात सुधारणाही दिसून येत आहे. त्यातच नाफेडने महत्वाच्या राज्यांमध्ये खरेदी सुरु केली.
त्याचाही आधार बाजाराला मिळतोय. हरभरा दरात मागील काही दिवसांपासून क्विंटलमागं १०० रुपये सुधारणा दिसून आली. सध्या ग्राहक बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार २५० रुपये दर मिळतोय.
तर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ४ हजार ६०० ते ५ हजार १५० रुपयांपर्यंत दर आहे. पण उत्पादनातील घट आणि नाफेडच्या खरेदीमुळे हरभरा दरात आणखी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.