तेलबिया, कडधान्यांसाठी विशेष अर्थसाह्य द्या

शेतकऱ्यांनी तेलबिया आणि कडधान्य उत्पादन वाढवावे, यासाठी त्यांना हमीभावाने खरेदीची शाश्वती सरकारने द्यावी. हे शक्य नसल्यास विशेष अर्थसाह्य द्यावे.
Pulses
PulsesAgrowon

पुणे ः देशात तेलबिया (Oil Seed) आणि कडधान्याचे उत्पादन (Pulses Production) कमी होते. त्यामुळे देशाला आयात (Pulses Import) करून गरज भागवावी लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात चलन खर्ची पडते. त्यामुळे सरकारने आयातीवर भर देण्यापेक्षा तेलबिया (Oil Seed Production) आणि कडधान्य उत्पादन (Pulses Production) वाढीवर भर द्यावा. या पिकांसाठी शेतकऱ्यांना हमीभाव खरेदीची शाश्वती किंवा अनुदान योजना (Subsidy Scheme) सुरु करावी, अशी मागणी सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Solvent Extractor Association Of India) अर्थात ‘एसईए’ने केली.

Pulses
तेलबिया उत्पादकांसाठी अद्ययावत दर तफावत भरपाई योजना राबवा- सीएसीपी

भारताला दरवर्षी २३० ते २३५ लाख टन खाद्यतेलाची गरज असते. त्यापैकी १३० ते १३५ लाख टनांची आयात केली जाते. मागील वर्षात १३२ लाख टन आयात झाली. तर कडधान्य आयात २३ लाख टनांवर पोचली. देशात तेलबिया उत्पादनच कमी होत असल्याने आयात अपरिहार्य आहे. मात्र देशात पुरेसे कडधान्य उत्पादन होत असतानाही दर पाडण्यासाठी आयात केली जाते. तुरीचीही गरज नसताना आयात झाली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. तसेच या आयातीसाठी मोठा खर्चही करावा लागला. त्यामुळे आयात न करता देशातच उत्पादन वाढीवर भर देण्याची मागणी ‘एसईए’ने केली.

Pulses
तेलबिया’ क्रांतीनेच साधेल खाद्यतेल स्वयंपूर्णतः

शेतकऱ्यांनी तेलबिया आणि कडधान्य उत्पादन वाढवावे, यासाठी त्यांना हमीभावाने खरेदीची शाश्वती सरकारने द्यावी. हे शक्य नसल्यास विशेष अर्थसाह्य द्यावे. केंद्राने विशेषतः पंजाब आणि हरियानावर पीकपद्धती बदलासाठी लक्ष द्यावे. खरिपात येथील शेतकऱ्यांना भाताऐवजी मका आणि रब्बीत गव्हाऐवजी मोहरी लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, अशी मागणी ‘एसईए’ने केली.

खरिपासाठी मॉन्सूनचा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र देशात जवळपास निम्म्या भागांत मॉन्सून पोचला नाही. त्यामुळे खरिपाच्या लागवडी धीम्या गतीने सुरु आहेत. मात्र हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे देशाच्या उर्वरित भागांत पुढील आठवडाभरात मॉन्सून दाखल होईल. त्यानंतर पाऊसही वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातील पेरण्या वेग घेतील, असेही ‘एसईए’ने म्हटले आहे.

आयात धोरणाचा फेरविचार करावा

देशात मागील वर्षभरात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने साठा मर्यादा, आयात शुल्क कपात यासारखे निर्णय घेतले. तसेच अलीकडेच केंद्राने ४० लाख टन सोयातेल आणि सूर्यफूल तेलाच्या विनाशुल्क आयातीला परवानगी दिली. मात्र ‘एसईए’ने या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

शुल्कमुक्त आयातीचा निर्णय मागे घ्या

‘एसईए’च्या मते, खाद्यतेलांचे दर मार्चच्या तुलनेत घटले आहेत. पामतेल २०१० डॉलर प्रतिटनावरून ६२५ डॉलरवर आले. तर सोयातेलाचेही दर ३८४ डॉलरनी कमी झाले आहेत. तसेच सूर्यफुलतेलाचे दर २८५ डॉलरनी घटले. त्यामुळे देशातील उद्योगाला संरक्षण देण्यासाठी सरकारने शुल्कमुक्त आयातीचा निर्णय मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com