
Bhandara News : पावसाळ्यात काही दिवस उपलब्ध होणारी आणि सर्वांच्या पसंतीस उरणारी रानभाजी म्हणून जंगली आळंबी (सात्या) ओळखली जाते. सध्या मागणी असल्याच्या परिणामी सात्याचे दर २५० ते १००० रुपये किलोवर पोहोचले आहेत. फुलावरील सात्याचे दर २०० ते ४०० रुपयांपर्यंत आहेत.
अळंबीची उत्पादन व्यवसायिक पद्धतीने घेता येणे शक्य आहे. परंतु नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या अळंबी (सात्या) ची चव जिभेवर रुळणारी असल्याने ग्राहकांची याला मागणी राहते. परिणामी सात्या विक्रीच्या व्यवसायात महिन्यातील आठ ते १५ दिवसांच्या कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल होते. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात सात्या विक्रेते रस्त्यावर आपली दुकाने मांडतात.
यंदा पावसाळा लांबल्याने सात्याची बाजारातील उपलब्धतादेखील लांबणीवर पडली होती. परिणामी खवय्यांना बराचकाळ प्रतीक्षा करावी लागली. दमदार पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसे पाणी मुरले की वारुळ, पालापाचोळा, कचरा, बांबूची बेटे अशा ठिकाणी जंगलामध्ये अळंबी (सात्या) निघायला सुरुवात होते. सात्या काढण्याचे काम जोखमीचे राहते.
जंगलात अनेक प्रकारच्या सात्या उगवत असल्या तरी खाण्यायोग्य मोजक्याच प्रजाती असतात. यातील काही विषारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या रानभाजीची पुरेसी ओळख असणेदेखील गरजेचे ठरते. वारुळातून सात्या निघाल्या की लोकांची मागणी वाढते. सात्या, डुंबर सात्या, वेळू सात्या असे काही प्रकार जंगली अळंबीचे आहेत.
काही भागांत याचा औषधी म्हणूनदेखील वापर होतो. सध्या ग्राहकांची वाढती मागणी असल्याने दरात देखील सुधारणा दिसत आहे. सध्या प्रकारानुसार २५० ते १००० रुपये किलोपर्यंतचा दर सात्याला मिळत आहे. हा आठवडाभरा सात्याची उपलब्धता बाजारात राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.