
Pune News : हरभरा बाजारात मागील दोन आठवड्यांपासून दरात पुन्हा काहीशी सुधारणा झाली. तर हरभरा पेरणी गेल्यावर्षीपेक्षा काहीशी आघाडीवर आहे. असे असले तरी वाढता उष्णता आणि बदलत्या हवामानाचा पिकाला फटकाही बसत आहे. त्यामुळे उत्पादनात फार मोठ्या वाढीची शक्यता नाही. यंदाही सरकार हरभऱ्याची मोठी खरेदी करण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींचा हरभरा बाजाराला आधार मिळणार आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दर पुन्हा ६ हजारांची पातळी गाठू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात नव्या हरभऱ्याची आवक काही प्रमाणात सुरु झाली. लवकर लागवड झालेल्या हरभऱ्याची आवक बाजारात झाली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान तसेच गुजरातमधील काही बाजारात नव्या हरभऱ्याने एन्ट्री मारली. असे असले तरी सध्याची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे बाजारातील आवक खपूच आहे. मात्र दुसरीकडे उठाव चांगला आहे. त्यामुळे सध्या भावापतळी काही बाजारांमध्ये ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्याही पुढे दिसत आहे.
देशातील बाजारात मागील काही महिन्यांमध्ये हरभऱ्याच्या भावात मोठी घट झाली होती. हरभरा जवळपास ७ हजार ८०० रुपयांवरून हरभरा ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान आला होता. हरभरा बाजारावर पिवळा वाटाणा आयात आणि रब्बीतील पेरा तसेच पोषक हवामानाचा परिणाम दिसत आहे. ऑस्ट्रेलियातून नव्या मालाची आयातही होत आहे. याचा दबाव दरावर दिसून आला होता. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात नरमाई आली होती. पण हरभरा भाव मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा काहीसे सुधारले आहेत.
हरभऱ्याची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा एक लाख हेक्टरने आघाडीवर आहे. यंदा आतापर्यंत ९७ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. यंदा लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अजूनतरी वाढलेली दिसत नाही. त्यातच हरभरा पिकाला सध्या बदलते वातावरण आणि काही भागातील पावसाचाही फटका बसला. तसेच यापुढच्या काळातही वाढती उष्णता आणि अवकाळी पाऊस फटका देण्याची शक्यता आहे. या कारणांनी यंदा उत्पादनात फार मोठी वाढ होईल, याची शक्यता खूपच कमी आहे. तरीही उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज आहे.
देशातील उत्पादन वाढले तरी दरावर फार मोठा दबाव येण्याची शक्यता धूसर आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे हरभरा हे भारताचे महत्वाचे कडधान्य पीक आहे. सरकारलाही कडधान्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी हरभऱ्याचा आधार असतो. सरकार मागील काही वर्षांपासून हरभऱ्याचा मोठा स्टाॅक घेऊन चालत आहे. मागीलवर्षी जेव्हा नवा हंगाम सुरु झाला तेव्हा सरकारकडे तब्बल २५ लाख हरभरा होता. एवढे असूनही सरकारने खेरदी केली. मात्र तरीही सरकारला हरभऱ्यातील तेजी रोखता आली नाही.
आता तर सरकारकडे यंदा ८ लाखांच्या दरम्यानच स्टाॅक असल्याची चर्चा आहे. काही जणांच्या मते हरभरा स्टाॅक यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे सरकारला हरभऱ्याचा बफर स्टाॅक करण्यासाठी खरेदी वाढवावीच लागेल. अन्यथा देशात कडधान्य उत्पादन घटीमुळे बाजारात येणारी तेजी सरकारला रोखता येणार नाही. सरकारने आतापर्यंत तेजी रोखण्यासाठी हरभऱ्याचा हत्यार म्हणून वापर केलेला आहे. यंदाही सरकार तोच कित्ती गिरवण्याची शक्यता आहे.
सरकारने यंदा हरभऱ्याला ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. सरकार खेरदीही यंदा चांगली करेल. त्यामुळे हरभरा बाजाराला हमीभावाचा आधार असेल. पण आवकेचा दबाव वाढल्यानंतर बाजारात हरभरा भाव हमीभावापेक्षा कमी होऊ शकतात. भावपातळी ५ हजार ३०० रुपयांपर्यंत येऊ शकतात. पण सरकारच्या खेरदीमुळे बाजाराला आधार राहील. तसेच मालातील ओलावा कमी झाल्यानंतर खुल्या बाजारातील दरही हमीभावाच्या दरम्यान येऊ शकतात. तसेच आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरपातळी ६ हजारांच्या दरम्यान पोहचू शकते, असा अंदाज सध्याच्या परिस्थितीवरून अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.