
Pune News : देशात कापसाचे भाव दबावातच आहेत. कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर खेडा खरेदीत ६ हजार ५०० ते ७ हजारांचा भाव मिळत आहे. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी महिनाभर राहू शकते. दरात काहिसे चढ उतारही राहण्याचा अंदाज आहे. कारण बाजारातील आवक या काळात जास्त राहील. एकदा देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.
सध्या बाजारात कापासाची आवक शिगेला पोचली. रोज १ लाख ८० हजार ते १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे. आवक शिगेला पोचल्यामुळेही कापूस भावावर दबाव आला. त्यातच सध्या पुढे सुताला उठाव कमी असल्याचे सांगितले जात आहे. पण अशा चर्चा शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर सुरु होतातच. त्यात नविन काही नाही. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापडाला उठाव नाही, अनेक देशात आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशाही बातम्या बाजारात पसरवल्या जात आहे.
या बातम्यांमध्ये काही प्रमाणात तथ्य आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही. कारण यंदा देशातच उत्पादन कमी आहे. यंदा देशातील उत्पादन ३०० लाख गाठींच्या दरम्यान राहील, असे सर्वांचे अंदाज आहेत. सरकारने यंदा २९९ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला. कापूस उत्पादन आणि वापर समितीनेही २९९ लाख गाठींचा अंदाज दिला. तर काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने ३०२ लाख गाठींचा अंदाज दिला. हा अंदाज काही दिवसात आणखी कमी होऊ शकतो. थोडक्यात काय तर सर्वच संस्थांचे अंदाज यंदा उत्पादन कमी होणार हे स्पष्ट करत आहेत. उत्पादन कमी होणार असले तर वापर वाढण्याची शक्यता आहे.
यंदा उत्पादन कमी होणार असले तरी आवक सध्या जास्त आहे. त्याचा दरावर दबाव दिसून येत आहे. देशातील भाव सध्या कमी असल्यानेच आयात शक्य होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे भाव कमी आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आयात करायचा म्हटले तरी त्या कापसाचे भाव देशातील भावाएवढेच पडतात. देशात सध्या रुईचे भाव ५३ हजार ते ५४ हजार रुपये प्रतिखंडीचा भाव आहे. कापसाची एक खंडी ३५६ किलोची असते. देशात कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क आहे.
दुसरं म्हणजे भारताची निर्यात सध्या होत नसल्याचे सांगितले जाते. तसेच यंदा निर्यात कमी राहील, असेही अंदाज आहेत. यंदा तसेही उत्पादन कमी असल्याने निर्यात कमीच राहणार आहे. उलट भारताला आयात करावी लागणार आहे. भारत जेव्हा आयातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव वाढतील. कारण भारतासारखा निर्यातदार देश कापूस खरेदी करतो म्हटल्यावर निर्यातदार देश भाव वाढवतात. इतर शेतीमालाच्या बाबतीत आपल्याला हा अनुभव याआधीही आलेला आहे.
देशात जानेवारीपर्यंत कापसाची आवक जास्त असते. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर जानेवारीपासून कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो. भारताची निर्यात सुरु झाल्याचाही आधार बाजाराला मिळेल. मात्र तोपर्यंत बाजारात चढ उतार राहू शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना थांबणे शक्य आहे त्यांनी थांबायला हरकत नाही. आपला कापूस गरजेप्रमाणे टप्प्याटप्याने बाजारात विकावा. मात्र शेतकऱ्यांनी शक्यतो हमीभावाच्या खाली विक्री टाळावी. अगदी गरज असेल तर सीसीआयला कापूस द्यावा, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.