
Jalagaon Banana Market News : जगातून भारताकडे रोज किमान ६०० कंटेनर केळीची मागणी (Banana Demand) आहे. दर्जेदार केळी उत्पादनासंबंधी (Banana Production) राज्यात किंवा देशातील अनेक भागांत कार्यवाही होत असल्याने गुणवत्तापूर्ण केळीची परदेशातील निर्यातही (Banana Export) सुमारे ४० टक्क्यांनी वाढली आहे.
मागणीच्या तुलनेत देशातून परदेशात केळीचा पुरवठा (Banana Supply) पुढेही शक्य नाही. निर्यातीच्या केळीचा तुटवडा कायम राहणार असून, दर टिकून राहतील, असे संकेत आहेत.
मागील वर्षी देशात जानेवारी ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत केळीचे दर सरासरी ४०० रुपये प्रति क्विंटल होते. परंतु मागील काही महिन्यांत केळीची परदेशातील निर्यात वाढली आहे. कारण देशात अनेक भागांत केळीसंबंधी फ्रूटकेअर तंत्र कमाल शेतकऱ्यांनी आत्मसात केले आहे.
यामुळे केळीची गुणवत्ता सुधारली आहे. देशात केळीचे क्षेत्र आठ लाख ३० हजार हेक्टर आहे. राज्यातील क्षेत्र ८४ हजार हेक्टर असून, त्यात जळगावात सुमारे ५० हजार हेक्टवर केळी आहेत. देशाची केळी उत्पादकता ३६ टन प्रति हेक्टर आहे.
त्यात राज्याची उत्पादकता ६५ टन आणि जळगावची ७६ टन प्रति हेक्टरी उत्पादकता आहे. सध्या देशातून रोज ७५ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे.
कारण आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशातील गोरखपूर भागात केळी काढणीवर नाही. फक्त तमिळनाडू व राज्यातील सोलापूर भागात अधिकची केळी परदेशात निर्यातीसाठी उपलब्ध होत आहे.
सोलापूर भागातून रोज १८ ते ३० कंटेनर केळीची निर्यात सध्या होत आहे. तर खानदेशातून रोज तीन कंटेनर केळीची परदेशात निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीचे दर प्रति क्विंटल ३१२५ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत.
कारण नियार्तीच्या केळीचा तुटवडा आहे. खानदेशात सध्या कांदेबाग केळीची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. यामुळे खानदेशात केळी हवी तेवढी निर्यातीसाठी उपलब्ध नाही. खानदेशातून मार्चमध्ये केळीची परदेशात निर्यात होईल.
यंदा खानदेशातून किमान दोन हजार कंटेनर, तर राज्यातून सुमारे सहा हजार कंटेनर केळीची आखातात निर्यात होईल, असा अंदाज आहे.
इराणमध्ये पसंती
इराणमध्ये केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांनी नुकतीच भेट दिली. तेथे केळीचे आयातदार, खरेदीदार व इतर संबंधितांशी त्यांनी चर्चा केली. त्यात तेथील केळीचे आयातदार हुसेन यांची भेट पाटील यांनी घेतली. त्यात दर्जेदार केळी भारतातून येत आहे.
केळीची गुणवत्ता चांगली असल्याने ग्राहकांची इराणमधील ग्राहकांची पसंती आहे. भारतीय केळीची आयात यंदा वाढविली जाईल, असे या चर्चेत हुसेन म्हणाल्याची माहिती के. बी. पटील यांनी दिली.
हुसेन हे इराणमधील विविध भागात रोज एक कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची विक्री तेथे करतात. जेवढी मागणी इराणमध्ये केळीची आहे. तेवढा पुरवठा भारतातून होत नसल्याची माहितीदेखील या चर्चेतून समोर आल्याचे पाटील म्हणाले.
फिलिपिन्समध्ये रोगराई, तर इक्वेडोरमधून वाहतूक परवडेना
कोविडमुळे बंधने आल्याने फिलिपिन्समध्ये पनामा रोगाला शेतकरी अटकाव करू शकले नाहीत. तेथे हा रोग वाढला. सुमारे ३० टक्के केळीचे उत्पादन कमी आले. फिलिपिन्स हा आखातात केळीचा मोठा पुरवठा करतो, पण फिलिपिन्समध्ये संकट आहे.
पुढे किमान वर्षभर हे संकट असणार आहे. तसेच आखातात इक्वेडोरमधूनही केळीचा मोठा पुरवठा केला जातो. पण हा पुरवठा निम्मा कमी झाला आहे. कारण आखातात इक्वेडोरमधून केळी आणताना आयातदारांना कंटेनरचे दुप्पट भाडे द्यावे लागत आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात केळीसंबंधी पोकळी किंवा भारतातून केळी निर्यातीची संधी वाढली आहे. आखातात भारतीय केळी पाठविण्यासाठी तेथील आयातदारांना तुलनेत कमी वाहतूक खर्च द्यावा लागतो.
यामुळे परदेशातील किंवा आखातातील आयातदार, ग्राहकांकडून भारतीय केळीला मागणी आहे. यामुळे केळीची निर्यात यंदा वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
पुढे देशातही केळीची मागणी वाढेल. परदेशात विशेषतः आखातात केळीला मोठी मागणी राहणार आहे. ती मागणी देशातील पुरवठादार पूर्ण करू शकणार नाहीत, एवढी असणार आहे. सध्या रोज ६०० कंटेनर केळीची मागणी परदेशातून आहे. ही मागणी पुढे वाढू शकते. देशात किंवा राज्यात गुणवत्तापूर्ण केळीचे उत्पादन वाढले आहे. याचाही लाभ होत आहे.
- के. बी. पाटील, केळीतज्ज्ञ, जळगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.