
Kolhapur News गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील साखर उत्पादन (Sugar Production) १५ एप्रिलअखेर १७ लाख टनांनी घटले आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादन घटल्याचा मोठा परिणाम देशाच्या उत्पादनावरही झाला आहे.
देशातील ५३२ पैकी ४०० साखर कारखाने बंद झाले आहेत. सध्या केवळ १३२ साखर कारखाने (Sugar Mill) सुरू आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ३०५ साखर कारखाने सुरू होते. यात महाराष्ट्रातील १५३ कारखाने सुरू होते. यंदा मात्र महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत.
देशात या कालावधीत ३११ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ३२८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशात अपवाद वगळता समान स्थिती आहे.
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात २ लाख टनांनी साखर उत्पादन वाढले. या कालावधीत ९४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यंदा त्या ठिकाणी ९६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्रात मात्र यंदा मोठी घट झाली आहे. महाराष्ट्रात १५ एप्रिलअखेर १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत हेच उत्पादन १२६ लाख टनांपर्यंत होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २० लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. जवळपास इतकाच फरक देशाच्या साखर उत्पादनावरही झाला आहे.
कर्नाटकात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ लाख टनाने साखर उत्पादन घटले. या कालावधीत कर्नाटकात गेल्या वर्षी ५८ लाख, तर साखर तयार झाली होती. यंदा ती ५५ लाख टनावर आली आहे.
गेल्या वर्षी देशात उत्पादनात आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने यंदा सर्वप्रथम आपला पूर्ण हंगाम संपवला आहे. कर्नाटकातील केवळ २ कारखाने सुरू आहेत. उत्तर प्रदेशात अजूनही ७७ साखर कारखाने सुरू असल्याने आणखीन एक महिना तरी साखर हंगाम सुरू राहील, अशी शक्यता आहे.
१५ एप्रिलला महाराष्ट्राचे साखर उत्पादन थांबल्याने आता उत्तर प्रदेशातून होणारे साखर उत्पादनच देशातील साखर उत्पादन काही प्रमाणात वाढवण्यास कारणीभूत ठरेल, अन्यथा अन्य भागातून निर्मिती अतिशय कमी प्रमाणात होईल, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
बहुतांश राज्यात हंगाम अंतिम टप्प्यात
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक वगळता तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड आणि ओडिसा या राज्यांत ५४ लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे.
बहुतांश राज्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पंधरा दिवसांत देशातील साखर कारखाने गतीने बंद होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उत्तर प्रदेश उत्पादनात अग्रेसर राहण्याची शक्यता
महाराष्ट्रातील साखर निर्मिती १०५ लाख टनावर थांबल्याने यंदा उत्तर प्रदेशाला साखर उत्पादनात अग्रेसर स्थान मिळवण्याची संधी आहे. उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेत अजूनही ९ लाख टनांनी मागे आहे.
अजून जादा प्रमाणात साखर कारखाने उत्तर प्रदेशात सुरू असल्याने महाराष्ट्राच्या साखर उत्पादनाच्या बरोबरीने उत्तर प्रदेशात साखर उत्पादन होऊ शकते, अशी शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.