
नाशिक : राज्यातील फूल उत्पादक शेतकरी (Flower Producer Farmer) प्रयोगशीलतेने काम करीत आहे. त्यामुळेच राज्यात व्यावसायिक पातळीवर विविध फुलांच्या मोठ्या प्रमाणावर लागवडी (Flower Farming) झाल्या आहेत. सणासुदीच्या काळात फुलांना मोठी मागणी असते. मात्र अलीकडे प्लॅस्टिक फुलांची (Artificial Flower) विक्री वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादित फुलांची मागणी (Flower Demand) घटली आहे. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिक फुलांवर बंदी आणण्यासाठी सोशल मीडियावर ‘#Ban_Plastic_flowers’ ट्रेंड चालविला जात आहे. त्याद्वारे ‘फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना साथ द्या अन पर्यावरण वाचवा,’ अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
प्लॅस्टिकचा वापर वाढल्याने पर्यावरणीय अनेक प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे प्लॅस्टिक बंदीच्या चर्चा होत असताना सणासुदीच्या तोंडावर प्लॅस्टिकच्या फुलांची बाजारात मोठी उपलब्धता आहे. त्यामुळे एकीकडे पर्यावरणाचा, तर दुसरीकडे फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर विक्रीचा प्रश्न उभा आहे. यापूर्वी मर्यादित फुलांच्या प्लॅस्टिक प्रतिकृती असलेली फुले बाजारात होती. मात्र चालुवर्षी मोठ्या प्रमाणावर झेंडू, निशिगंध, ऑर्किड, गुलाब, जरबेरा यांची तर सोबतच आंब्याच्या तोरणमाळा विक्रीसाठी आहेत. त्यामुळे झेंडू उत्पादन शेतकऱ्याची बाजारपेठ अडचणीत आली आहे. जवळपास २५ टक्के फटका बसत असल्याचे झेंडू उत्पादकांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी अगोदरच बँकांचे कर्ज घेउन शेडनेट व पॉलिहाऊसमध्ये गुलाब, शेवंती, ऍस्टर, निशिगंध, जरबेरा, ऑर्किड यांसारख्या व्यावसायिक फुलांच्या लागवडी केल्या आहेत. त्यात गेल्या दोन वर्षांत कोरोनाचे सावट असताना उत्पादन हाती होते. पण मंदिरे, कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, उत्सव बंद असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात ठप्प झाली. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाला. फुले तोडून रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. तर काही शेतकऱ्यांनी लागवडी उपटून टाकल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यातच आता प्लॅस्टिक फुलांनी बाजारपेठेत केलेले आक्रमण शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला मोठा फटका देऊ पाहत आहे.
सण-उत्सवांचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी फुलांच्या लागवडी केल्या आहेत. मात्र प्लॅस्टिक फुले तुलनेत स्वस्त आहेत. पर्यावरणास ती हानिकारक आहेत. पण तरीही तुलनेत नैसर्गिक फुलांना यावर्षी मागणी कमी आहे. प्लॅस्टिक फुलांना गंध, सुवास, नजाकत नाही. तरीही त्यांची सहज उपलब्धता, दिखाऊपणा आणि स्वस्तात असल्यामुळे लोकांचा कल त्याच्याकडे वाढू लागला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी सरकार नेमकी काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे आहे.
राजू शेट्टींनी वेधले पर्यावरणमंत्र्यांचे लक्ष
चीनी बनावटीच्या प्लॅस्टिक कृत्रिम फुलांमुळे देशातील फूल उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. चीनी बनावटीच्या प्लॅस्टिक फुलांच्या आयातीमुळे पुन्हा एकदा देशातील फुलशेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनी कृत्रिम प्लॅस्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.