Jalgaon News : खानदेशात केळी दरात सरत्या आठवड्यात क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपये घसरण झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील व्यापारी लॉबी एक झाली असून, त्यांनी ऐन मागणीच्या हंगामात दर पाडल्याचा आरोप केला जात आहे.
खानदेशात केळीची आवक स्थिर आहे. कुठलीही वाढ त्यात मागील पाच ते सहा दिवसांत झालेली नाही. सध्या रोज ६५ ते ७० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक खानदेशात होत आहे. ही आवक जळगावातील चोपडा, जामनेर, यावल या भागात आहे. रावेर, मुक्ताईनगरात आवक कमी आहे.
धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात आवक फारशी नाही. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातील व्यापारी लॉबी दर पाडण्यासाठी सक्रिय झालेली आहे. यामुळे केळीच्या दरात मोठी पडझड झाल्याची स्थिती आहे.
दरात एकाच दिवसात ६०० व नंतर आणखी घसरण झाली होती. यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांवर दर पाडल्याचा आरोप करीत आहेत. केळीला खानदेशात उठाव आहे. सणासुदीचे दिवस आहेत. पुढे नवरात्रोत्सव आहे. सध्या राज्यात पितृपक्ष असल्यानेही केळीस उठाव आहे. उत्तरेकडेही केळीला मागणी आहे. केळी आवक खानदेशात वाढलेली नाही. अशात दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एका घडामागे किमान १०० रुपयांचे नुकसान सध्या उत्पादक शेतकरी सहन करीत आहेत.
बाजार समित्या मूग गिळून गप्प
केळीची आवक सध्या चोपडा, यावल, जळगाव, जामनेर आदी क्षेत्रात अधिक आहे. या भागातील बाजार समित्या मात्र दरांची पडझड व व्यापाऱ्यांचे संगनमत यावर बोलायला किंवा कारवाईस तयार नाही. आवक कमी असताना दरात मोठी घसरण कशी झाली, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. बाजार समित्या फक्त शुल्क वसुली करून आपली कमाई करीत आहेत. केळी व्यापार थेट शिवारात होतो. कुठलाही नोंद याबाबत बाजार समित्यांकडे नसते, यामुळे यासंबंधी बाजार समित्यांनी भरारी पथके नेमून कारवाई करावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.