
थोडक्यात माहिती :
खानदेशात केळीची काढणी सुरू असून, व्यापारी शेतकऱ्यांना जाहीर दरांपेक्षा २०० ते ५०० रुपये कमी दर देत आहेत.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीने कमी दर देणाऱ्या ४ व्यापाऱ्यांवर कारवाई. जळगाव, चोपडा व रावेर बाजार समित्यांनीही अशा व्यापाऱ्यांवर कारावाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
गारपीट, वादळामुळे खराब झालेली केळी दाखवून व्यापारी दर्जेदार केळीही कमी दरात घेत असून, थेट शेतातून खरेदी फारशी होत नाही.
Jalgaon News : खानदेशात अर्ली किंवा आगाप कांदेबाग केळी बागांची काढणी सुरू आहे. परंतु प्रचलित दरांच्या तुलनेत २०० ते ५०० रुपये कमी दरात केळी खरेदीचा प्रकार सर्वत्र सुरू आहे. जाहीर दरांच्या तुलनेत किंवा लिलावात जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दर दिल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीने चार व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे.
या चार व्यापाऱ्यांनी बाजार समितीत जी बोली केळी खरेदीसंबंधी जाहीर लिलावात लावली होती, त्या तुलनेत संबंधित शेतकऱ्यांना कमी दर दिला. यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासन, बाजार समितीकडे तक्रार केली. यानंतर बाजार समितीने या चार व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होऊ दिले नाही.
यावरून बऱ्हाणपुरात व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले. लिलावात भाग न घेता चार व्यापाऱ्यांचा बचाव व्यापारी लॉबीने केला. नंतर प्रशासनाने तेथे संबंधितांना ताकीद दिली व अन्य खरेदीदारांनाही समज दिली. यानंतर तेथे लिलाव सुरळीत झाले.
केळीची लागवड व उत्पादनात देशात जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. पण जिल्ह्यात मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारातील दरांनुसार केळीची खरेदी केली जाते. बऱ्हाणपूर भागातील व्यापारी लॉबीचे केळी व्यापारावर अलीकडे नियंत्रण आहे.
तेथे जो प्रकार आहे, तोच प्रकार जळगाव जिल्ह्यातही सुरू असल्याने यात जळगाव जिल्हा प्रशासन व मध्य प्रदेश प्रशासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना केळीसंबंधी चांगले दर मिळवून द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
राज्यात केळीचे दर रावेर येथील बाजार समिती रोज जाहीर करते. परंतु जे दर जाहीर होतात, त्यात खरेदी केली जात नाही, त्यामुळे बऱ्हाणपुरात जशी कारवाई झाली, तशी कारवाई जळगाव, चोपडा, रावेर या समित्यांनीही करावी, अशी मागणी केळी उत्पादक करीत आहेत.
केळीची थेट खरेदी फारशी नाही
सध्या केळीची अधिक आवक यावल, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव, जामनेर भागांत सुरू आहे. परंतु कमी दर्जाच्या केळीचे कारण सांगून केळीची खरेदी प्रचलित दरांपेक्षा २०० ते ५०० रुपये कमी दरात केली जात आहे.
कारण खानदेशात डिसेंबर २०२४, मार्च व मे, जून २०२५ या महिन्यांत केळीला वादळ, गारपिटीचा फटका बसला. गारपीट, वादळ, उष्णतेत खराब झालेली केळी कमी दरात खरेदी करू, असे खरेदीदार सांगत आहेत.
शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. खरेदीदार त्याच बोलीवर शेतकऱ्यांना केळी काढणीचे आश्वासन देत आहेत. सध्या खानदेशात केळीची थेट खरेदी फारशी सुरू नाही. कारण आवक कमी आहे. दर्जेदार केळी, जळगाव, चोपडा, यावल, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर या भागांत आहे. रावेरमध्येही कांदेबाग केळी यंदा अधिक आहे. पण जो प्रकार कमी दर्जाच्या केळीबाबत खरेदीदार करीत आहेत, तोच प्रकार दर्जेदार केळीच्या खरेदीतही सुरू आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: व्यापारी शेतकऱ्यांना कमी दर का देत आहेत?
उत्तर: वादळ, गारपीट व उष्णतेचा बहाणा करून केळी कमी दर्जाची असल्याचे सांगून कमी दर देत आहेत.
प्रश्न: बऱ्हाणपूर बाजार समितीने कोणती कारवाई केली?
उत्तर: लिलावात कमी दर दिल्यामुळे ४ व्यापाऱ्यांना निलंबित करून त्यांना लिलावात सहभागी होऊ दिले नाही.
प्रश्न: केळी थेट शेतातून खरेदी केली जात आहे का?
उत्तर: सध्या थेट खरेदी फारशी होत नाही; व्यापारी लिलावाच्या माध्यमातूनच खरेदी करत आहेत.
प्रश्न: शेतकऱ्यांची मुख्य मागणी काय आहे?
उत्तर: बऱ्हाणपूरप्रमाणे जळगाव व इतर बाजार समित्यांनी कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी.
प्रश्न: केळीची सर्वाधिक आवक कोणत्या भागात आहे?
उत्तर: यावल, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव, जामनेर, रावेर या भागांत सध्या केळीची अधिक आवक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.