
Cotton Rate Update : खरिप हंगाम आता तोंडावर आला. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) माॅन्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. या अंदाजात हवामान विभागानं देशात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस होईल, असे म्हटले.
तर कापसासाठी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा चांगला भाव मिळत आहे. त्यामुळं बियाणे उद्योगानेही चांगल्या हंगामाची अपेक्षा व्यक्त केली.
येणाऱ्या खरिपात कापसाखालील क्षेत्र वाढण्याचा अंदाज बियाणे उद्योगाने व्यक्त केला. फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे महासंचालक राम कौंडिण्या यांनी बिझनेसलाईला दिलेल्या माहितीनुसार, चालू हंगामात कापसाचे उत्पादन कमी झाले.
पण दुसरीकडे देशातील कापड उद्योगाला जास्त कापूस हवा आहे. त्यामुळं यंदा कापूस हंगामाबाबत सर्वजण सकारात्मक आहेत.
मागील हंगामात देशात ४ कोटी २० लाख कापूस बियाणे पाकीटांची मागणी होती. ती यंदा वाढून ४ कोटी ९० लाख पाकिटांपर्यंत वाढेल. एका पाकिटात ४५० ग्राम बियाणे असते.
देशात मागील हंगामात १२७ लाख ५० हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. मात्र चालू हंगामात कापसाचे भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. तर दुसरीकडे उत्पादन कमी राहील्याने कापड उद्योगाची मागणी वाढली आहे. त्यामुळं यंदा कापूस लागवड १० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज बियाणे उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे.
देशातील शेतकरी मागील काही वर्षांपासून सघन कापूस लागवडीकडे वळत आहेत. सघन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक कापूस लागवड पध्दतीत कापूस लागवडीसाठी दोन एकरांसाठी तीन बियाणे पाकिटांची गरज असते.
पण सघन लागवडीसाठी दोन एकरांमध्ये १० पाकीटे बियाणे लागते. सध्या देशात घन लागवड प्राथमिक पातळीवर असली तरी तीचा विस्तार होताना दिसत आहे. त्यामुळे बियाण्याला मागणीही वाढेल, असा अंदाज बियाणे उद्योगाने व्यक्त केला.
देशातील कापूस लागवडीविषयी बियाणे उद्योग सकारात्मक आहे. केंद्र सरकारनं यंदा देशातील कापूस उत्पादन ३३७ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज जाहिर केला. मागील हंगामात देशात ३११ लाख गाठी उत्पादन झालं होतं.
तर अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं यंदा भारताचं उत्पादन ३१३ लाख गाठींवर स्थिरावेल, तसचं भारतातून होणारी निर्यात घडेल, कापूस निर्यात यंदा २३ लाख गाठीवरच राहील, असा अंदाज जाहीर केला.
देशात यंदा कापूस उत्पादन घटले. त्यासोबतच शेतकरी कापसाची विक्री मर्यादीत करत आहेत. त्यामुळं कापसाचा बाजार तुटला नाही. गेल्या हंगामात मध्यानंतर कापूस दरात मोठी वाढ झाली होती. यंदाही हा दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाचा स्टाॅक केला होता.
आतापर्यंत काही शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. सध्या कापासाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळतोय. मे महिन्यात आगाप कापूस लागवड सुरु होईल. या काळात शेतकरी कापूस विकतील, असा अंदाज उद्योगांना आहे.
त्यामुळं सध्याच्या भावात आवक वाढेल, अशी आशाही उद्योगांकडून व्यक्त केली जात आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये कापसाची आवक कमी होऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.