
अनिल जाधव
Chana Rate : पुणेः शेतकऱ्यांचा हिरमोड करणाऱ्या हरभऱ्यानं आता सर्वांनाच धक्का दिला. हरभऱ्याने तूर आणि उडदाचा रस्ता धरलाय. हरभरा मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटलमागं ५०० ते ७०० रुपयांनी वाढला. विशेष म्हणजे देशात विक्रमी उत्पादन होऊन आणि नाफेडकडे उच्चांकी स्टाॅक असूनही हरभरा भाव वाढत आहेत. हरभरा भाव आता प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांवर पोचले.
हरभरा भाव आता बहुतांशी बाजारांमध्ये हमीभावाच्या जवळपास पोचले. यामुळे व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांनाही धक्का बसला. कारण सरकारने यंदा देशातील हरभरा उत्पादन विक्रमी १३५ लाख टनांवर पोचलं होतं. मागील हंगामातील स्टाॅकही २० ते २५ लाख टनांच्या दरम्यान होता. यापैकी नाफेडकडेच १४ ते १५ लाख टन हरभरा शिल्लक होता. त्यामुळे नव्या हंगामात पुरवठा खूपच जास्त दिसत होता. बरं भाव कमी करण्यासाठी नाफेडने मागील हंगामातील हरभारही विक्रीला काढला. म्हणजे सरकारची खुल्या बाजारात हरभरा विक्रीही सुरु आहे. पण असं असूनही हरभरा भावात वाढ झाली. मग पुरवठा उच्चांकी पातळीवर असताना भावातील वाढ का आणि कशी झाली? याचं कोड सध्या सर्वांनाच पडलं.
बरं शेतकऱ्यांचा माल बाजारात येत असताना विक्रमी उत्पादनाचे अंदाज आले. त्यामुळे बाजार दबावात राहीला. हमीभाव ५ हजार ३३५ रुपये असताना बाजारात शेतकऱ्यांना केवळ ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. भाव वाढत नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांना हरभरा विकून टाकला. आता बाजारातील आवक खूपच कमी आहे. त्यातच सणांमुळे हरभऱ्याला मागणी वाढली, यामुळे हरभरा भाव वाढल्याचे सांगितले जाते. सध्या हरभऱ्याला ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांचा भाव मिळतोय. पण ज्या प्रमाणात भाव वाढले त्यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नाफेडकडे हरभऱ्याचा विक्रमी स्टाॅक आहे. गेल्या हंगामात शिल्लक १४ ते १५ लाख टन आणि यंदाची खरेदी २३ लाख ५० हजार टन, असा एकूण जवळपास ३८ लाख टनांचा स्टाॅक नाफेडकडे आहे. नाफेडच्या याच स्टाॅकचा दबाव आतापर्यंत बाजारावर होता. पण हा दबाव आता दूर होताना दिसत आहे. मग सध्या बाजारावर सरकारच्या १३५ लाख टन उत्पादनाचा दबाव नाही आणि नाफेडच्या स्टाॅकचाही दबाव नाही. मग नेमकं गणित चुकत कुठं. उद्योगांनी तर आता सरकारच्या अंदाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याला सुरुवात केली.
सध्या सणांमुळे हरभऱ्याला मागणी वाढली. त्यातच सरकारला रेशनवर हरभरा डाळ द्यावी लागते. त्यामुळे नाफेड बाजारात आक्रमक विक्री करू शकत नाही. तर सध्या पावसाने चिंता वाढवली आहे. यामुळे रब्बीत उत्पादन किती येईल हे सांगता येत नाही. त्यामुळेच हरभरा भावाला आधार मिळत असल्याचे जाणकारांनी सांगितले. तर हरभरा आणखी काही प्रमाणात भाव खाऊ शकतो, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.