
अनिल जाधव
पुणेः बदलत्या वातावरणामुळे जगाला पाऊस, दुष्काळ, पूर आणि वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्याची तीव्रता पुढील काळात वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी पावसात आणि पौष्टीक असलेल्या ज्वारीला (Jowar) महत्व येत आहे. जगात ज्वारीचा आहारात, पशुखाद्यात (Animal Feed) आणि जैवइंधनासाठीही वापर होतो. मात्र देशात यंदा पावसाने ज्वारी उत्पादनाचे गणित बदलेले आहे. त्यामुळे यंदा ज्वारीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे.
जागतिक पातळीवर आता कमी पावसात येणाऱ्या आणि पौष्टीक पिकांना महत्व दिले जात आहे. कोरोनाकाळात लोकांना ज्वारी, बाजरीसह इतर भरडधान्याचे महत्व कळाले. त्यामुळे या पिकांना मागणी वाढले. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २०२२-२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष जाहीर केले आहे. भरडधान्यामध्ये ज्वारीला जास्त महत्व वाढणार आहे.
सध्या जागतिक पातळीवर शेतीपिकामध्ये मक्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र मक्याला जास्त अन्नद्रव्य लागते. त्यामुळे जमिनिच्या सुपिकतेवर परिणाम होतो, असे मानले जाते. त्यामुळे मक्याला पर्याय म्हणून काही देशांमध्ये ज्वारीकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. तसे इथेनाॅलसाठी ज्वारीची काही वाणही विकसित करण्यात आलेले आहेत. मानवी आहारातही पौष्टीक धान्य म्हणून ज्वारीचा वापर वाढत आहे.
देशाचा विचार करता खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात ज्वारी उत्पादन घेतलं जातं. खरिपातील ज्वारी काढणी पूर्ण झाली आहे. खरिपात यंदा गेल्यावर्षीपेक्षा लागवड काहीशी कमी होऊन १४ लाख २३ हजार हेक्टरवर पोचली होती. मात्र देशातील खरिपाचं सरासरी क्षेत्र जवळपास २० लाख हेक्टर आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा पेरा ५ लाख ७७ हजार हेक्टरने कमी झाला होता.
केंद्राने यंदा उत्पादन ४४ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज व्यक्त केला. खरिपात ३० लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं होत. गेल्या खरिपातील ज्वारी उत्पादन १६ लाख होतं. सरकारने पहिल्या अंदाजात जवळपास १७ लाख टनांवर उत्पादन स्थिरावेल असं म्हटल आहे. पण यंदा उत्तर भारतातील महत्वाच्या खरिप ज्वारी उत्पादक राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा ज्वारीला मोठा फटका बसला. त्यामुळं खरिपातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.
देशात आता रब्बीचा पेरा सुरु आहे. आत्तापर्यंत १९.४४ लाख हेक्टरवर पेरा झाला. गेल्यावर्षी याच काळात एव्हढाच पेरा झाला होता. सध्या गेल्यावर्षीऐवढे क्षेत्र दिसत असले तरी पुढील काळात क्षेत्र कमी राहू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. कारण गव्हाला सध्या चांगला दर आहे. त्यातच नोव्हेंबरमधील पावसाने ज्वारी पेरणीला यंदा उशीर होत आहे.
…………..
पेरणीवर परिणाम
राज्यात रब्बी ज्वारी पेरणीत सोलापूर, नगर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नाशिक ही महत्वाचे जिल्हे मानले जातात. मात्र परतीचा पाऊस जास्त दिवस रेंगाळल्याने या जिल्ह्यांमध्येही रब्बी पेरणीला उशीर झाला. तसेच थंडी पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यातेच मागील हंगामात फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता वाढली होती. मार्चमध्ये तर विक्रमी तापमान राहीले होते. सध्याच्या तापमानाच अंदाज घेता यंदाही अशीच काहीशी परिस्थिती राहू शकते, असा अंदाज काही हवामानविषयक जाणकार व्यक्त करत आहेत. असे झाल्यास ज्वारीच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो.
……………
सध्या काय दर मिळतोय?
ज्वारीच्या दरात ऑक्टोबर महिन्यापासून वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्यात ज्वारीला सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत दर होते. मात्र मागील दोन महिन्यांमध्ये ज्वारीच्या दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांची सुधारणा झाली आहे. सध्या बाजारात खरिपातील ज्वारीची आवक होत आहे. मात्र तरीही ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. त्यातच खरिपातील उत्पादन कमी राहल्याचा अंदाज, रब्बी पेरणीला होणारा उशीर आणि वाढती मागणी यामुळे यंदा ज्वारीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.