
Soybean Edible Oil Update : मागीलवर्षी खाद्यतेल बाजारात (Edible Oil Rate) मोठी तेजी आली होती. निवडणुका तोंडावर असल्यानं यंदा ही तेजी सरकारला परवडणारी नव्हती. त्यामुळं सरकारनं खाद्यतेल आयात वाढवली. देशात खाद्यतेलाचे साठे असतानाही आयातीची गती कायम होती.
शेतकरीच नाही तर खूद्द उद्योगही आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी करत होते. पण सरकारनं महागाईच्या नावाखाली खाद्यतेल बाजार दबावात ठेवला. पण याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागले.
मागील वर्षभरापासून देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा सुरु आहे. याचा दबाव देशातील खाद्येतल बाजार आणि पर्यायानं तेलबियांवर येतोय. सोयाबीन आणि मोहरी उत्पादकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय.
भारताचं तेल वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असं असतं. म्हणजेच नवं तेल वर्ष सुरु होऊन आता पाच महिने झाले. या पाच महिन्यांमध्ये भारतानं जवळपास ७० लाख टन खाद्यतेलाची आयात केली. जी मागीलवर्षी याच काळातील आयातीपेक्षा १४ लाख टनांनी अधिक आहे.
खाद्यतेल आयातीत पामतेलाचा समावेश अधिक आहे. गेल्या वर्षी याच पाच महिन्यांमध्ये २६ लाख टन पामतेल देशात आलं होतं. यंदा मात्र पामतेल आयात ४४ लाख टनांवर पोचली. म्हणजेच भारताच्या एकूण खाद्यतेल आयातीत पामतेलाचा वाटा जवळपास ६३ टक्के आहे.
जो मागील हंगामात ४६ टक्के होता. या पाच महिन्यांमध्ये पामोलिनची निर्यात २२ टक्क्यांनी वाढली. पामोलिन निर्यातीनं जवळपास १० लाख टनांचा टप्पा गाठला.
पामोलिन आणि रिफाईंड खाद्यतेलाची आयात वाढल्यानं देशातील रिफाईंड उद्योगालाही फटका बसला. त्यामुळं उद्योगांनी कच्चे पामतेल आणि पामोलिन आयातीशुल्कातील अंतर सध्याच्या ७.५ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याची मागणी केली.
भारत पामतेलाची आयात कमी करु शकतो, हे लक्षात आल्यानंतर इंडोनेशिया आणि मलेशियानं कमी दरात पामतेल देऊ केलं. यामुळं देशात पामतेल आणि पर्यायानं खाद्यतेल आयात वाढली.
पामतेल दर कमी झाले पण मागणी दिसत नसल्यानं या दोन्ही देशांनी दरात पुन्हा कपात केली. यामुळं पामतेल आणखी स्वस्त झालं.
स्वस्त खाद्यतेल आयातीमुळं भारतात खाद्यतेलाचे साठे होते, मात्र स्वस्त तेल मिळत असल्यानं आयात वाढली. पामतेलासोबतच सूर्यफुल तेलाचीही आयात मोठ्या प्रमाणात झाली. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्दामुळे सूर्यफुल तेलाचे साठे पडून होते.
हे साठे नव्या हंगामाच्या तोंडावर बाहेर काढणं गरजेचं होतं. त्यामुळं या दोन्ही देशांनी तेलाचे भाव कमी केले. सूर्यफुल तेल सोयातेलापेक्षा स्वस्त मिळत होते. त्यामुळं भारतासह महत्वाच्या आयातदार देशांनी सूर्यफुल तेल आयात वाढवली.
देशात सोयातेलावर कायम दबाव राहीला. मोहरी तेलही स्वस्त झालं. सोयाबीन दरवाढीसाठी यंदा सोयातेलाचा आधार मिळाला नाही. देशात खाद्यतेलाचे साठे पडून आहेत. त्यामुळं खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली जाते.
खाद्यतेल आयात शुल्कात वाढ झाली आणि आयात नियंत्रित झाल्यास देशातील तेलबिया बाजारालाही आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
सध्या देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये भाव मिळतोय. यंदा भारतातून सोयापेंड निर्यात दुप्पट झाली.
याचाच आधार सोयाबीन मिळाला. पुढील काळात सोयाबीनची आवक होईल. यावेळी खाद्यतेलाकडून आधार मिळाल्यास सोयाबीनमध्ये चांगली वाढ दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.