
Tur Rate Bajarbhav : देशातील बाजारात तुरीचा पुरवठा (Tur Supply) वाढवण्यासाठी सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. सरकारनं व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांभोवतीचा फास आणखी घट्ट केला. परिणामी स्टाॅक बाहेर येण्यास सुरुवात झाली. तर दुसरीकडं सरकार आयातीवरही जोर देतंय. याचा बाजारावरही परिणाम होताना दिसत आहे.
देशात तुरीचा पुरवठा गरजेऐवढा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं. व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांनी तुरीचा स्टाॅक जाहीर करावा, अशी सुचना सरकारने केली आहे. त्यानुसार सरकारकडे माहिती देण्यात आली.
देशातील १४ हजार २६५ व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांनी दिलेल्या माहितीनुसार ५ लाख ७ हजार टन तुरीचा स्टाॅक आहे. एक महिन्यापुर्वी १२ हजार ८५० व्यापारी आणि संस्थांनी केवळ ९६ हजार ५९३ टन स्टाॅक असल्याची माहिती दिली होती.
पण अजूनही काही संस्था आणि व्यक्ती आपल्याकडील तुरीच्या स्टाॅकही माहिती देत नसल्याचा संशय सरकारला आहे. देशात यापेक्षा अधिक तुरीची स्टाॅक आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. ज्यांच्याकडे तुरीचा स्टाॅक आहे, त्यांनी त्याची माहिती द्यावी, अशी सूचना सरकारने पुन्हा केली.
केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात तुरीचा पुरवठा मागणी पूर्ण करू शकतो. तुरीची उपलब्धता आहे. तर काही कडधान्याचा स्टाॅक गरजेपेक्षाही जास्त आहे. सरकार तूर आणि उडदाची डाळ अवास्तव दरात विकू देणार नाही.
तसेच कुणीही स्टाॅक करून बाजाराला वेगळ्या दिशेने नेऊ शकणार नाही. सरकारने अजूनही स्टाॅक लिमिट लावले नाही. व्यापारी किंवा कुणी अशी आणू नये. सरकार वेळ पडल्यास स्टाॅक लिमिटही लावेल, असा इशाराही ग्राहक कल्याण विभागानं दिला.
सरकारने स्टाॅकची माहिती देण्यासाठी जबरदस्ती केल्यानंतर बाजारात तुरीचा पुरवठा काहीसा वाढला. यामुळं दरातील तेजी टिकून आहे. पण बाजारात यापेक्षा अधिक तूर यायला पाहिजे, असं सरकारला वाटतं.
ऐन आवकेच्या हंगामात तुरीच्या भावानं काही ठिकाणी ९ हजारांचा टप्पा गाठला होता. त्यामुळं दरातील तेजी वाढत जाईल असं वाटत होतं. पण आतापर्यंत तरी सरकारनं तुरीचे भाव स्थिर ठेवले. पण दरावर जास्त दबाव आला नाही. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ९०० रुपयांचा दर मिळतोय.
तुरीचा हंगाम सुरु होऊन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी झाला. नवा माल बाजारात येण्यास खूप वेळ आहे. तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या मालावरच भागवावं लागेल. भारताला आयात करण्यास मर्यादा येतात. त्यामुळं तुरीचे दर कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
पण पुढील काळात सरकारला तुरीचा पुरवठा कायम ठेवण्यात अपयश आलं तर तुरीच्या दरात तेजी येऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.