
औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील व्यापारी बँकांना सर्वाधिक ६२१९ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दुसरीकडे नेहमीप्रमाणे यंदाही व्यापारी बँकांची कर्ज पुरवठ्याची गती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व ग्रामीण बँकेचा तुलनेत संथच आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँक व ग्रामीण बँका मिळून सर्व बँकांना १० हजार ८०४ कोटी ६१ लाख ६४ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २७७१ कोटी ३२ लाख १५ हजार रुपये, ग्रामीण बँकेला १८१३ कोटी ५० लाख ७४ हजार रुपये तर व्यापारी बँकेला सर्वाधिक ६२१९ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
२३ मे पर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी मिळून उद्दिष्टाच्या तुलनेत ५१० कोटी २८ लाख ८० हजार रुपयांचा खर्च पुरवठा करत १८.४१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. ग्रामीण बँकेने १८५ कोटी ६४ लाख १४ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा करून १०.२४ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. तर व्यापारी बँकांनी मात्र मिळालेल्या सर्वाधिक उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ५.८६ टक्के उद्दिष्टपूर्ती करत ३६४ कोटी ६० लाख २४ हजार रुपयांचाच कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना केला.
शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज पुरवठा मिळण्याची निर्भरता व्यापारी बँकांवर अवलंबून आहे. दुसरीकडे त्यांची असलेली कर्ज पुरवठ्याची संथ गती शेतकऱ्यांच्या खरिपाच्या नियोजनातील आर्थिक अडचणींना सहाय्यभूत ठरताना दिसत नाही. त्यामुळे व्यापारी बँकांसह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व ग्रामीण बँकेने पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी आपली संथ गती अधिक गतिमान करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.