
Latur News : केंद्र सरकारने यंदा सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोयाबीन खरेदीसाठी सुरुवातीला बारदाना व त्यानंतर ओलाव्याची अडचण झाली. यातच हभीभावाने सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणीची पहिली १५ नोव्हेंबरची मुदत संपून केली. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.
यातच १२ ऐवजी १५ टक्के ओलावा असला तरी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र, १३ दिवस उलटून गेले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांकडील सोयाबीनमधील ओलावा आपोआप कमी होत असल्याने केंद्रावर सोयाबीनची खरेदी वाढली आहे. यातच सरकारने नोंदणीसाठी दुसऱ्यांदा १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
मुदतवाढीच्या वृत्ताला जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे यांनी दुजोरा दिला. मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांची ओलाव्यामुळे झालेली कोंडी दूर झाली आहे. यंदा सरकारने पहिल्यांदाच सोयाबीनची चार हजार ८९२ रुपये क्विंटलच्या हभीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लातूरमध्ये १५ तर धाराशिवमध्ये १८ केंद्र सुरू करण्यात आली.
प्रत्यक्षात १५ ऑक्टोबरपासून खरेदीला सुरुवात करण्यात आली. मात्र, सुरुवातीला बारदाना व त्यानंतर सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १६ ते १७ टक्के असल्याने खरेदी झाली नाही. केंद्रावर १२ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदीचे बंधन आहे. या गोंधळातच केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठीची नोंदणीची १५ नोव्हेंबरची मुदत संपून गेली. १५ नोव्हेंबर रोजीच केंद्र सरकारने अधिसूचना काढत सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी ओलाव्याचा निकष १२ वरुन १५ टक्के केला. मात्र, केंद्राचा हा निर्णय अजून तरी खरेदी केंद्रांपर्यंत पोहोचला नाही.
या निर्णयाची अंमबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढण्याची गरज आहे. मात्र, हे आदेश सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काढता येत नसल्याचे सांगण्यात येत होते. आचारसंहिता उठली तरी आदेश निघाले नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती.
बाजारात चार हजार चारशे रुपये कमाल तर तीन हजार सहाशे रुपये किमान भाव झाला. भाव कमी होऊन ओलाव्याच्या निकषाची अंमलबजावणी होत नव्हती. दुसरीकडे निकष बदलण्याच्या प्रतीक्षेत काढणी झालेल्या सोयाबीनमधील ओलावा कमी झाला व त्याची केंद्रावर खरेदी झाली.
धाराशिवला तेरा हजार शेतकऱ्यांची नोंदणी
धाराशिव जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी आतापर्यंत १२ हजार ९७९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून वाढलेल्या मुदतीत आणखी नोंदणी होणार आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील केंद्रावर आतापर्यंत १९ हजार ७२८ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असून खरेदीस नकार दिलेल्या सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काडी, कचरा, ओलावा व अन्य कारणांमुळे केंद्रावर रिजेक्ट केलेल्या सोयाबीनच्या खरेदीबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. यात २२८ वाणाच्या निळंसकर रिंगाच्या सोयाबीनच्या खरेदीलाही नकार देण्यात येत असून ‘नाफेड’चे अधिकारी याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.