डॉ. राजश्री जोशीSustainable Farming: ‘बाएफ’ संस्थेच्या माध्यमातून महिलांना केवळ लाभार्थी न मानता ‘क्लायमेट लीडर्स’ म्हणून घडवले जात आहे. कृषी सखी, पशू सखी आणि डिजिटल सखींच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य आणि नेतृत्वाला गती मिळाली आहे. जलसंधारण, हवामान तटस्थ शेती, जैवविविधता संवर्धन आणि महिला अनुकूल यांत्रिकीकरणातून महिलांचा श्रमभार कमी करताना उत्पन्न आणि लवचिकता वाढवली जात आहे. हरित उद्योगांना चालना देत संस्थेने महिलांना शाश्वत उपजीविका आणि निर्णय प्रक्रियेत स्थान मिळवून दिले आहे..भारतातील ग्रामीण भागातील महिलेच्या दैनंदिन कामकाजाचे चित्र म्हणजे, ती पहाटे उठते, पाणी भरते, जनावरांची काळजी घेते, शेतीत राबते, घर सांभाळते आणि कुटुंबासाठी पुरेसे जेवणही करते. कुटुंबातील सुखदुःखाचे प्रसंग देखील सांभाळते. मात्र इतकी सगळी कामे करूनही ती कुणाच्या लक्षातही येत नाही. तिचे श्रम दिसतात, पण तिची ओळख मात्र अनेकदा मागेच राहते. ही कथा बदलण्याचे काम बाएफ संस्था करत आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र हे १८ राज्ये, ३५६ जिल्हे आणि एक लाखांहून अधिक गावांमध्ये विस्तारलेले आहे. .Women Entrereneueship: ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम .दरवर्षी सुमारे चाळीस लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे. महिलांच्या कष्टांचे ओझे कमी करणे, त्यांच्या आरोग्य,पोषणात सुधारणा करणे आणि कौशल्यविकासाद्वारे सक्षम बनवणे ही संस्थेची भूमिका आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे महिलांना केवळ उत्पन्नाचे साधन मिळत नाही, तर त्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभागी बनून ग्रामपरिवर्तनाच्या केंद्रस्थानी येत आहेत. ग्रामीण महिलांसाठी स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने पशू सखी, कृषी सखी, डिजिटल सखी आणि ई- दोस्त यासारख्या स्थानिक ‘केडर’ची उभारणी झाली आहे. .या माध्यमातून महिलांना त्यांच्या स्वतःच्या गावात राहूनच नवीन ज्ञान, कौशल्ये आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होत आहेत. विविध भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितींमध्ये शेतकरी महिलांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक शाश्वत विकासाचे मॉडेल उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये केवळ महिलांना मार्गदर्शन नव्हे तर निर्णय घ्यायला आणि नेतृत्व करायला शिकवले जाते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने हे काम अधिक महत्त्वाचे ठरणार आहे..वाडी प्रकल्पातून मिळाली ओळख...बाएफ संस्थेने सर्वात आधी महिलांना ओळख दिली. वाडी आणि जलसंधारण प्रकल्पांमध्ये जमीन पतिपत्नीच्या नावावर केली गेली. या छोट्या वाटणाऱ्या बदलाने मोठा फरक पडला. महिलांना वाटू लागले, की ‘ही जमीन माझीही आहे.’ स्वयंसाह्यता गटांमुळे महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली. ‘उमेद’ उपक्रमांमुळे बचत सुरू झाली, कर्ज घेतले आणि हळूहळू त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागल्या. त्यातून कुटुंब आणि गावाची देखील प्रगती झाली. आपल्या आजी, आईला कोणते बियाणे कधी पेरायचे, कोणते धान्य पौष्टिक आहे, हे सगळे माहीत असते. हीच खरी संपत्ती आहे. आम्ही या पारंपरिक ज्ञानाला पुढे नेत आहोत. यातूनच महिलांनी पुन्हा गावरान ज्वारी, बाजरी, कडधान्ये आणि स्थानिक भाज्या लागवडीस सुरुवात केली आहे. घरच्या अंगणात पोषण बागा तयार होत आहेत. त्यामुळे घरातील अन्न पौष्टिक झाले आणि खर्चही कमी झाला..हवामानाला तोंड देणारी शेतीगेल्या काही वर्षांत पाऊस वेळेवर येत नाही, पाणी कमी झाले आहे, त्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होतो. पाणी, चारा, लाकूड आणण्यासाठी जास्त वेळ आणि श्रम करावे लागतात. घरचा पुरुष शहरात कामाला गेल्यावर शेतीची जबाबदारीही महिलांवर येते. काम वाढते, पण सोयी मात्र तितक्या वाढत नाहीत. या समस्येला समजून घेत महिलांसाठी उपाय शोधण्यावर आम्ही भर दिला आहे..Women Empowerment: महिलांचा पंचायत ते संसद प्रवास सोपा होईल : मोदी.संस्थेने हवामान बदलाचा महिलांवर होणारा असमतोल परिणाम ओळखून हवामान आणि लिंग समानतेचा एकत्रित दृष्टिकोन स्वीकारला आहे. महिलांना केवळ लाभार्थी न मानता त्यांना ‘क्लायमेट लीडर्स’ म्हणून घडवत आहोत. कृषी सखी, पशू सखी, आणि डिजिटल सखींच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य आणि नेतृत्व विकसित होत आहे. जलसंधारण, हवामान तटस्थ शेती, जैवविविधता संवर्धन आणि महिला अनुकूल यांत्रिकीकरणातून महिलांचा श्रमभार कमी करताना उत्पन्न आणि लवचिकता वाढवली जात आहे. .महिलांच्या नेतृत्वाखालील हरित उद्योगांना चालना देत संस्थेने महिलांना शाश्वत उपजीविका आणि निर्णय प्रक्रियेतील स्थान मिळवून दिले आहे. ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ कार्यक्रमामुळे महिलांनी पाणी बचत, झाडे लावणे आणि मिश्र शेती यासारख्या पद्धती स्वीकारल्या आहेत. यामुळे शेती टिकाऊ आणि उपक्रमशील होत आहे. ‘महेंद्रा- प्रेरणा’ यासारख्या उपक्रमांतून महिला गटांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. महिलांनी धान्य प्रक्रिया, दुग्ध व्यवसाय तसेच सेंद्रिय उत्पादन निर्मितीमध्ये पुढाकार घेतला आहे. ही फक्त कमाई नाही, ही स्वावलंबनाची वाट आहे..कृषी पशू आणि डिजिटल सखींची साथगावातील कृषी सखी शेतीतील सुधारित पद्धती, हवामान बदलाशी सुसंगत शेती, बियाणे व्यवस्थापन आणि पीक उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करतात. पशुपालन विषयातील प्रशिक्षित महिला (पशू सखी) जनावरांचे आरोग्य, लसीकरण, आहार व्यवस्थापन आणि प्राथमिक उपचार यामध्ये शेतकऱ्यांना मदत करतात. संस्थेने ग्रामीण भागात डिजिटल सखींचा सक्षम समूह तयार केला आहे. या महिला स्वतः डिजिटल साधने आत्मसात करून गावात शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा पोहोचवितात..ई- दोस्त उपक्रमातून आर्थिक- डिजिटल व्यवहार, शासकीय योजना, बँकिंग सेवा, ऑनलाइन अर्ज आणि माहितीपर सुविधा गावातच उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे डिजिटल सखी केवळ सेवा देणाऱ्या नाहीत, तर डिजिटल परिवर्तनाच्या दिशादर्शक आहेत. संस्थेने महिलांच्या श्रमभाराची जाणीव ठेवून महिला स्वामित्व आणि व्यवस्थापनाखाली कस्टम हायरिंग सेंटर्स उभारले आहेत. या केंद्रांमुळे महिलांना शेतीसाठी हलकी व सोपी यंत्रसामग्री सहज उपलब्ध होते, ज्यामुळे कष्ट आणि वेळ दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होतात. या केंद्रांचे संचालन करून महिला इतर शेतकऱ्यांना यंत्रे, अवजारांचा पुरवठा करतात. .शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि तांत्रिक मार्गदर्शन करतात. तसेच स्वतःचे उत्पन्नही कमावतात, यातून श्रम कमी आणि उत्पन्न वाढ, असा दुहेरी लाभ साधला जातो. उदाहरणच द्यायचे झाले तर कंचन झा डिजिटल सखी म्हणून गावाला डिजिटल जगाशी जोडते. सविता जाधव हवामान बदलाला तोंड देत शेतीत नवे प्रयोग करते. लक्ष्मी नाईक बियाणे जतन करते. सुनीता भोये पशू सखी म्हणून जनावरांचे आरोग्य सांभाळते. मीना पवार बचत गट मजबूत करते. रेखा पाटील व्यवसाय उभा करते. अनिता कुमारी शेतीचे मार्गदर्शन करते आणि सुशीला देवी लोकांना योजना आणि बाजाराशी जोडते. या सगळ्या महिला एकच सांगतात, की आम्ही शाश्वत बदल घडवत आहोत.rajeshreejoshi@baif.org.in (लेखिका बाएफ, पुणे येथे कार्यक्रम संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.