गाऊट हा वातव्याधी असल्याने अाणि थोडा रक्तदुष्टीशी संबंध असल्याने हिवाळ्यात हा अाजार होतो. या अाजारामध्ये नेमकी लक्षणे अाणि कारणे कोणती असतात हे जाणून घेणे अावश्यक अाहे. सर्वांना सुपरिचित असणारी व्याधी म्हणजे गाऊट. आहार आणि आजार यांचा फार जवळचा संबंध असतो. त्यामुळे गाऊट अाजारात अाहार, पथ्यपाणी अाणि सवयी याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. लक्षणे
वेदनांची सुरवात हाताच्या किंवा पायाच्या पर्वसंधीपासून (बोटाचे पेरे) होते. पायापासून सुरवात होत असेल तर अंगठ्यामध्ये वेदना, लालसरपण, सूज निर्माण होऊन लक्षणे वाढत जातात. संधीवातामध्ये गुडघे, कोपर या वेदना नसतात. रक्तदुष्टी असल्याने बारीक फोडही येतात. सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष होता कामा नये. रोगाचे निदान अधिक पक्के होण्यासाठी रक्तातील युरीक ॲसिडची पातळी तपासली जाते. त्यामुळे ही तपासणी जरुर करून घ्यावी. रक्ततपासणीत फक्त युरीक ॲसिड वाढलेले दिसते. पण रक्तदुष्टीची लक्षणे म्हणजे खाज येणे, फोड येणे ही मात्र त्या रुग्णाला जाणवतात. त्यामुळे वेदना आणि गरमपणा या दोन्ही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. छोट्या सांध्यांपासून सुरवात, फोड, उष्णस्पर्ष ही महत्त्वाची लक्षणेही लक्षात ठेवावी. कारणांचा विचार करता वात वाढविणारी रक्तदोष निर्माण करणारी कारणे महत्त्वाची ठरतात. अती प्रमाणात दुचाकीवरून प्रवास, अनवाणी पायी चालण्याची सवय, कामाच्या नादात शाैचाच्या, लघवीच्या वेळा अडवून धरण्याची सवय, तिखट तळलेल्या पदार्थांचे सेवन, दही ठेचा अती प्रमाणात खाणे, वाटाणे उसळ अतीप्रमाणात खाणे, या सर्व गोष्टींची वात अाणि रक्ताची कामे बिघडतात. विशेषतः स्त्रियांना लोणचे, पापड, मिरची, लसूण-कांद्याचे वाटण, मुळा मेथीचा अति वापर या सर्वांचे आकर्षण असते आणि आवडही असते. शिवाय शिळेपदार्थ खाण्याची सवयही असते. या सर्व गोष्टींनी रक्तात बिघाड होतो. रक्त तपासणी केल्यावर या गोष्टी कळत नाहीत. लक्षणांवरूनच त्या ओळखाव्या लागतात. चिकित्सेचा विचार करता तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि युरिक ॲसिडची पातळी तपासणे गरजेचे असते. चिकित्सा करताना तीव्रतेनुरूप मात्रा ठरवावी लागते. कैशोर, गुग्गुळ, अमृतादी गुग्गुळ, पुनर्नवा गुग्गुळ या औषधांचा चांगला फायदा होतो. सांध्यांवर दशांग लेप, शतधौत धृत लावणे यामुळे आग, फोड लक्षणे कमी होतात. महामंजिष्ठादी काढ्याचा रक्तदुष्टी कमी करण्याच्या दृष्टीने फायदा होतो. लक्षणे कमी झाली तरीसुद्धा संशमनी वटी किंवा गुळवेलीने सिद्ध केलेले औषधी तूप पोटात घेणे चालू ठेवावे. वरील सर्व उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत. औषधाच्या जोडीला पथ्यपालन आवश्यक आहेच. पथ्य ः
अतितिखट पदार्थ, हिरवी मिरची ठेचा, आंबट दही, आंबट ताक, चायनीज काही दिवस बंद करावे. शिळे पदार्थ, शिळ्या पदार्थांपासून केलेले ताजे पदार्थ पूर्ण बंद करावेत. मेथी, मुळा यांचा कमी उपयोग करावा. रोजचा मांसाहार टाळावा. नेहमीचा आहार, गोड ताक, शिरा, उपमा, धिरडे, थालिपीठ, दूध, काळ्या मनुका, खजूर, पोळी, भाकरी, कमी तिखट सर्व भाज्या जरूर सेवन कराव्यात. पाणी भरपूर प्यावे. शहाळे, सरबत, फळांचे रस यांवर भर द्यावा. ॲलोपॅथिक औषधे चालू असली तर जोडीला हे पथ्य जरूर पाळावे. लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ञ अाहेत.