गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या पुस्तकांच्या आधारे भू सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख करून घेत आहे. मागील भागामध्ये आपण सूक्ष्मजीवांसाठी परिस्थितिकी, कर्बचक्र आणि हायड्रोकार्बन हा भाग पाहिला. या वेळी नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती घेऊ. युरियाचे अमोनियम कार्बामेट झाल्यानंतर पुढे स्थिरीकरणाकडे अगर उपलब्धीकरणाकडे वाटचाल होते. वाढणाऱ्या वनस्पतीची मागणी असल्यास अमोनियमचा प्राणवायूशी संयोग होऊन पहिल्या पायरीत नायट्राईट व त्यानंतर नायट्रेट तयार होते. याला मराठीत नत्रीकरण म्हणता येईल. बहुतेक वनस्पती (भात हा अपवाद) या नत्राचे सेवन नायट्रेट स्वरूपात करतात. यामुळे शेतकऱ्यांच्या अभ्यासासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. या संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे पाहू.
नत्रीकरण ही जैविक क्रिया आहे. अमोनियम ------ नायट्रोसोमोनस -------- नायट्राईट नायट्राईट -------- नायट्रोबॅक्टर -------- नायट्रेट
यानंतर आपण नत्रचक्रातील शेवटच्या सहजीवी व असहजीवी नत्र स्थिरीकरण या दोन प्रकरणे पाहू. जैविक नत्र स्थिरीकरणाच्या वेगासाठी तीन प्रमुख बाबी - १. जिवाणूंची संख्या कमाल असली पाहिजे. २. नवीन पेशी तयार होण्याचा वेग मोठा असला पाहिजे. ३. स्थिरीकरण झालेला नत्र प्रामुख्याने हवेतून आलेला असला पाहिजे. नवीन पेशी तयार होण्याच्या वेगासंबंधी लेखक लिहितो . २ किलो नत्र प्रतिहेक्टर स्थिरीकरणासाठी प्रतिग्रॅम मातीमध्ये १० चा ७ वा घात ( म्हणजे दहावर सात शून्ये) इतके जिवाणू असणे गरजेचे असते. दररोज प्रतिग्रॅम मातीत ५० हजार जिवाणू तयार झाल्यास हेक्टरी २ किलो नत्र स्थिरीकरण होऊ शकते. (हे प्रमाण फक्त नत्रासाठीचे आहे. बाकी अन्नद्रव्यासाठीचा हिशोब वेगळा.) ( हे सर्व जिवाणू जमिनीत वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची काय तयारी करावी, याविषयी येथे फारशी चर्चा नाही. मात्र, आपण या मालिकेत लेख क्र. १० मध्ये त्याची चर्चा केली आहे. मागील भागामध्ये जैविक नत्रस्थिरीकरणातील जिवाणूंचे वर्गीकरण दिले आहे.) जिवाणूंच्या पोषणासाठी व ऊर्जेसाठी सेंद्रिय कर्बाची गरज असते. या विषयी लेखक लिहितो.
सहजीवी नत्र स्थिरीकरणावर अनेक बाबींचा प्रभाव असतो. त्या खालीलप्रमाणे -
जमिनीतून नत्र उपलब्ध झाल्यास हवेतून नत्र स्थिरीकरण मंदावते. मुळावरील गाठींचे प्रमाण कमी जास्त होते. मॉलिब्डेनम् या घटकाचा स्थिरीकरणाशी अन्नोन्य संबंध आहे. एक संदर्भ सांगतो की वाटाणा पीक पानात तयार झालेल्या अन्नद्रव्यांपैकी ३२ टक्के मुळावरील गाठीतील जिवाणूंच्या कार्यभागासाठी, १६ टक्के वाढीसाठी, ३७ टक्के श्वसनासाठी, बाकी १५ टक्के झाडात वेगवेगळ्या भागात स्थिर होते. यामुळे धान्याच्या तुलनेत कडधान्याचे उत्पादन कमी असते. आज कृषी विद्यापीठे तथा खासगी उत्पादकाकडून विकत घेऊन जिवाणू खताची पाकिटे शेतकरी अपुऱ्या ज्ञानाने वापरत राहतात. नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना कोण सांगणार? ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,
(लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.