साठवणुकीच्या काळात होणारी वजनातील घट, तसेच रोगांच्या प्रादुर्भावामुळे कांद्याची गुणवत्ता कमी होते. हे लक्षात घेता लागवडीपासूनच कांदा पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवणे गरजेचे आहे. रांगडा कांदा जानेवारी-मार्च तर रब्बी कांदा मे-नोव्हेंबर महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होतो. रब्बी कांद्याची साठवण केली जाते. परंतु साठवणुकीच्या काळात होणारी वजनातील घट, अंकुरण (कोंब येणे) तसेच रोग प्रादुर्भावामुळे गुणवत्ता कमी होऊन नुकसान होते. बुरशीजन्य रोग काळी बुरशी
साठवणुकी दरम्यान ३० ते ३५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान व ७० टक्के पेक्षा जास्त आर्द्रता यामुळे रोग वाढतो. कांदा चाळीत हा रोग दिसतो. कांद्याच्या वरच्या पापुद्र्याच्या आत काळ्या रंगाच्या बुरशीचे असंख्य पुंजके दिसतात. बुरशीची वाढ होऊन वरच्या एक दोन पापुद्र्यापर्यंत पोहचते. कालांतराने कांद्याचा पृष्ठभाग काळा होतो. काजळी युक्त कांद्याला कमी बाजारभाव मिळतो. रोगाचा प्रादुर्भाव शेतातूनच काढणीस आलेल्या कांद्याला होतो. लक्षणे साठवणुकीत दिसू लागतात. यामुळे ५० टक्के नुकसान होऊ शकते. रोगकारक बुरशी कांद्याची मान व काढणीच्यावेळी झालेली इजा यातून शिरकाव करते. मानेतील पेशी मऊ पडून रोगग्रस्त कांदे सडतात, त्यावर धूसर राखाडी रंगाच्या बुरशीचे आवरण तयार होते. रोगग्रस्त कांदा उभा कापल्यास मानेखालचा भाग शिजल्याप्रमाणे तपकिरी दिसतो. काढणीनंतर व्यवस्थित सुकवला नाही, चाळीत तापमान वाढल्यास याचा अधिक प्रसार होतो. रोगट बियाण्यामार्फतही हा रोग पसरतो. सुरवातीस कांद्यावर पिवळ्या रंगाचे खोलगट चट्टे पडतात. त्यावर हिरवट-निळसर बुरशीची वाढ होते. मध्यम तापमान (२१ ते २५ अंश सेल्सिअस) व उच्च आर्द्रतेमध्ये प्रादुर्भाव वाढतो. रोग प्रामुख्याने पांढऱ्या कांद्यामध्ये आढळतो. लाल किंवा पिवळ्या कांद्यात याचा प्रादुर्भाव क्वचित होतो. प्रादुर्भाव झाला तर तो कांद्याच्या मानेच्या भागापर्यंतच मर्यादित रहातो. प्रादुर्भाव काढणीपूर्वी शेतातूनच झाला असतो, त्याची तीव्रता साठवणुकीत वाढते. साठवणुकीत कांद्याच्या बाह्य भागावर काळ्या रंगाचे, साधारणतः १ इंच आकाराचे समकेंद्री वलये असलेले खोलगट चट्टे दिसतात. प्रादुर्भाव शेतातूनच झालेला असतो. परंतु लक्षणे साठवुणकीत आढळतात. मुळाकडच्या भागापासून रोगाची सुरवात होऊन लाल-तपकिरी कूज दिसू लागते. ही कूज कांद्याच्या वरच्या भागाकडे पसरत जाते. रोग ग्रस्त कांदे मऊ पडतात. त्यावर गुलाबी-पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. साठवणुकी दरम्यान अधिक तापमान (३५-४० अंश सेल्सिअस) व अधिक आर्द्रता (७५-८० टक्के) रोग वाढीस अनुकूल असते. रोगाचा प्रादुर्भाव शेतातून होतो. साठवणुकीच्या दरम्यान कांद्याच्या माने जवळच्या भागापासून रोगाची सुरवात होऊन आतला भाग सडून तपकिरी होतो. सड आतील पापुद्रयांपासून सुरु होऊन हळू-हळू बाहेरच्या आवरणापर्यंत पसरते. बाहेरून कांदा चांगला दिसतो, परंतु हलके दाबल्यास मऊ लागतो. पांढरा चिकट द्रव मानेच्या भागातून बाहेर येतो. त्याचा उग्र वास येतो. बाहेरून निरोगी दिसणारे रोगग्रस्त कांदे निवडून वेगळे करणे अवघड जाते. काढणीच्या वेळी पावसात सापडला, व्यवस्थित सुकवला नाही तर साठवणुकीत प्रादुर्भाव वाढतो. एकात्मिक रोग व्यवस्थापन साठवणुकीत आढळणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव मुख्यतः शेतातूनच झालेला असतो. कांदा काढणीनंतर व्यवस्थित न सुकवणे आणि साठवणीच्या चुकीच्या पद्धतीमुळे रोगांच्या वाढीस चालना मिळते. साठवणुकीत रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लागवडीपासून साठवणुकीपर्यंत विविध टप्प्यांवर उपाय योजना करणे महत्वाचे ठरते. बीज प्रक्रिया कांदा छाटणी
बरेचसे रोग मानेतून कांद्यात प्रवेश करतात. त्यामुळे कांदा छाटणी करताना लांब नाळ (२ ते ३ सेंमी) ठेऊन छाटणी करावी. छाटणी केलेले कांदे पातळ थर देऊन १५ दिवस सावलीत सुकवावेत. जाड मानेचे, जोड-कांदे निवडून वेगळे करावेत. बारीक मानेचे निरोगी कांदे साठवणुकीसाठी वापरावेत. कांदा चाळ उंचावर, पाणी न साचणाऱ्या जागेवर व हवेशीर असावी. चाळीभोवती गवत असणार नाही याची काळजी घ्यावी. दोन पाखी चाळ पूर्व-पश्चिम आणि एक पाखी चाळ दक्षिणोत्तर असावी. चांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता आणि तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान असावे. कांदा भरण्यापूर्वी रिकाम्या चाळीत २ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस) कांदा चाळीत ३ ते ४ फूट उंचीपर्यंत भरावा. दर दीड-दोन महिन्यांनी सडलेले किंवा कोंब आलेले कांदे निवडून वेगळे करावेत. संपर्क ः डॉ.वनिता साळुंखे,९०९६४४१२९० ( डॉ.साळुंखे या राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था, बारामती,जि.पुणे आणि डॉ. गेडाम या कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,जि. पुणे येथे कार्यरत आहेत)