सध्या बागेतील वातावरणातील बिघाडामुळे बागायतदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने घडकूज, गळ व डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत पाऊस व ढगाळी वातावरण जास्त प्रमाणात दिसून येत आहे. बागेत या वेळी प्रीब्लूम अवस्था, दोडा अवस्था, फुलोरा अवस्था व मणी सेटिंगनंतरची अवस्था आहे. या अवस्थेत द्राक्ष वेलीची शरीरशास्त्रीय हालचाल व्यवस्थित होणे गरजेचे असते. याकरिता तापमान व आर्द्रता महत्त्वाची आहे. द्राक्ष बागेतील घडकूज
बऱ्याचशा बागेत फळ छाटणीनंतर निघालेल्या फुटी काही दिवस तशाच राहिल्यास, त्याच फुटींची कॅनॉपी तयार होते. त्यामुळे गर्दी होते. वाढीच्या सुरवातीच्या काळात जरी प्रत्येक काडीवर घडाच्या पुढे ५ ते ६ पाने असली तरी या वेळी तयार झालेली कॅनॉपी वातावरणाचा विचार करता जास्त आहे. या कॅनॉपीमध्ये सूक्ष्म वातावरण जास्त प्रमाणात तयार होते. काडीवर प्रीब्लूम अवस्थेतील घड या वेळी फार नाजूक असतो. या घडाच्या पाकळ्यातील देठ पूर्ण तयार झालेला नसतो. इतक्या नाजूक अवस्थेत जर एक तास पाऊस किंवा दव पडत असेल तरी घडामध्ये कुजेची समस्या निर्माण होते. पाऊस आल्यानंतर किंवा ढगाळ वातावरणामध्ये बागेतील तापमान कमी होऊन आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते. या अवस्थेत वेलींमध्ये जिब्रेलिनचे प्रमाण तितक्याच प्रमाणात वाढते. वेलीमध्ये नायट्रस नायट्रोजनचे प्रमाणसुद्धा वाढताना दिसून येते. बऱ्याच वेळा बागेत दिवसभर पाऊस नसतो. मात्र संध्याकाळी हलकासा पाऊस पडला किंवा रात्रभर दव पडले असेल त्यामुळे घडामध्ये पाणी साचते. या वेळी घडामध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ पाणी साचलेले असते. त्यामुळे घडाची कूज जास्त प्रमाणात कूज झाल्याचे दिसून येईल. बदललेल्या वातावरणामुळे वेलीची वाढ जास्त प्रमाणात होत असताना दिसून येते. बऱ्याच वेळा घडाचा विकास होण्यासाठी जिबरेलिक ॲसिडची फवारणी केली जाते. त्यामुळे सुद्धा पानांचा आकार वाढताना दिसून येतो. यामुळे देखील बागेत दाट कॅनॉपी तयार होण्यास मदत होते. घडाचा विकास होण्याकरिता सूर्यप्रकाश मिळणे तितकेच महत्त्वाचे असते. परंतु कॅनॉपीच्या गर्दीत असलेल्या घडांवर सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होते. वेलीमध्ये नत्राचे प्रमाण वाढत असतानासुद्धा फुटींची वाढ जलद गतीने होते. त्यामुळे दाट कॅनोपी होऊन हवा खेळती राहण्यास अडचणी येतात. अशावेळी सूक्ष्म वातावरण जास्त प्रमाणात तयार होते. त्यामुळे घड कुजण्याची शक्यता असते. या वेळी पुढील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. त्वरित शेंडा पिंचिंग करणे : या वेळी वाढ झपाट्याने होत असल्यामुळे शेंडा पिचिंग करून वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. बगल फूट काढणे : दाट कॅनॉपीकरिता घडाच्या आजूबाजूच्या बगलफुटी त्रासदायक ठरतात. पावसाळी वातावरणात बगल फुटींचा जोम जास्त असतो. तेव्हा बगल फुटी काढून पानांची गर्दी कमी करता येईल. वेलीची वाढ नियंत्रणात ठेवणे : याकरिता वाढीच्या अवस्थेनुसार पालाश २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून २ ते ३ फवारण्या कराव्या. त्याचसोबतच जमिनीतून ठिबकद्वारे उपलब्धता करावी (प्रमाण ः एक ते दीड किलो प्रति एकर). नत्रयुक्त खतांच्या वापर काही दिवसांकरिता बंद करावा. कूज ही बऱ्यापैकी रोगाच्या प्रादुर्भावाशी संबंधित असताना दिसून येते. त्यामुळे रोगनियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. या वेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकांपेक्षा स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करून त्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करावी. बागेतील रोगनियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून मांजरी वाईनगार्ड २ मिलि प्रतिलिटर पाणी किंवा ड्रेचिंगद्वारे मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर वापर करावा. सुडोमोनास किंवा बॅसिलस प्रत्येकी ५ मिलि प्रतिलिटर पाणी यांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. बागेत कोरडे वातावरण ठेवणे : पाऊस थांबताच किंवा दव पडलेल्या परिस्थितीत ब्लोअर फिरवून पाणी घडाच्या बाहेर निघेल याची काळजी घ्यावी. जास्त पाऊस झालेल्या परिस्थितीत लगेच ओलांडे हलवून घ्यावेत. यामुळे घडामध्ये पाणी साचणार नाही. रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल. मणी गळ समस्या ढगाळ वातावरण असलेल्या परिस्थितीत मणीगळ जास्त प्रमाणात दिसते. ज्या बागेत कॅनॉपीची गर्दी जास्त प्रमाणात झाली आहे अशा बागेत गळ जास्त दिसते. प्रीब्लूम अवस्थेतील घडात प्रामुख्याने दोडा अवस्थेत गळ दिसून येते. कमान तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत आणि किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ६० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान असते, त्या वेळी ही गळ वाढताना दिसते. या परिस्थितीत आवश्यक असलेल्या शरीरशास्त्रीय हालचालींमध्ये बिघाड दिसून येतो. या वेळी बागेत शेंडा वाढ तितक्याच प्रमाणात दिसून येते. बऱ्याच परिस्थिती द्राक्ष घड पूर्णपणे रिकामा झालेला दिसतो. बऱ्याचदा मणी थिनिंगचे परिणाम चांगले मिळावेत यासाठी वेलीला पाण्याचा ताण दिला जातो. आपल्या बागेत विविध प्रकारच्या जमिनी (हलकी, मध्यम व भारी) असल्यामुळे त्या वेलीस किती ताण द्यावा हे आपल्याला कळत नाही. हा पाण्याचा ताण शक्यतोवर फुलोरा अवस्थेत गरजेचा असतो. फुलोरा गळ होण्याकरिता दोडा अवस्थेपासूनच पाण्याचा ताण सुरू केला जातो. परंतु थिनिंग मिळण्याकरिता नेमके पाणी किती पाहिजे? याचा आपल्याला अनुभव नसतो. त्यामुळे सुद्धा मणीगळ जास्त प्रमाणात होते. उपाययोजना
वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंडा पिचिंग करावा. बागेत काही दिवसांकरिता (३ ते ४ दिवस) पाण्याचा ताण पडणार नाही, असे नियोजन करावे. जास्त प्रमाणात गळ असल्यास गर्डलिंग किंवा ओलांड्यावर जखम करावी. कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहील अशा प्रकारचे वातावरण निर्माण करावे. कूज आणि गळ दोन्ही असल्यास मिनरल ऑइल २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून देखील रोग आणि कीड नियंत्रणात ठेवता येईल. पोटॅशचा वापरही तितकाच महत्त्वाचा असेल. यामुळे वाढ नियंत्रणात राहण्यास मदत होईल. - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२० ३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)