शेतकरी : रजनीकांत मनोहर वाडेकर. गाव : वाघोटण, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. आंबा क्षेत्र : १५ एकर वा घोटण (जि.सिंधुदुर्ग) येथे माझी १५ एकर जमीन आहे. सर्व कातळ जमीन असून त्यामध्येच खड्डे खोदून टप्प्याटप्प्याने हापूस आंब्याची लागवड केली आहे. लागवड ३० फूट बाय ३० फूट बाय अंतरावर आहे. सध्या बागेमध्ये हापूसची १५ ते ५० वर्षाची उत्पादनक्षम ४५० कलमे आणि पायरीची ५० कलमे आहेत. दरवर्षीचे नियोजन
जूनमध्ये १०ः२६ः२६ हे खत ३ ते ४ किलो, ५ः१०ः५ हे सेंद्रिय खत ५ ते १० किलो प्रतिझाड देण्यात येते. याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्ये ५०० ग्रॅम ते ३ किलो, एसओपी ५०० ते १ किलो प्रति झाड याप्रमाणे दिले जाते. १५ जुलै ते ३० ऑगस्ट यादरम्यान पॅक्लोबुट्राझोलचा वापर करण्यात येतो. ऑगस्टमध्ये संपूर्ण बागेची साफसफाई केली जाते. बागेतील तण काढून ते झाडांच्या आळ्यात पसरून त्यावर माती टाकली जाते. पावसाळी वातावरणामुळे झाडांवर बुरशी, तुडतुडे आणि अन्य किटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी मोहोर येण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये शिफारशीत कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची पहिली फवारणी केली जाते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाडांना मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू होते. मोहोर फुटतेवेळी सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी केली जाते. मोहोर फुलताना, फळे वाटाणा आणि लिंबू आकाराची झाल्यावर कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीए ची फवारणी घेतली जाते. फळे काढणीच्या २० ते ३० दिवस अगोदर पुन्हा फवारणी केली जाते. याशिवाय हवामान बदलामुळे बागेमध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यावेळी गरजेनुसार फवारणी करण्याची नियोजन असते. यावर्षी साधारणपणे २५ फेब्रुवारीपासून आंबा हंगामाला सुरवात झाली. साधारणपणे ६५ टक्के आंब्याची काढणी १० एप्रिलपर्यत आणि उर्वरित आंबा १५ मे पर्यत काढण्यात आला. आंब्याच्या वजनाप्रमाणे प्रतवारी केली जाते. आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार १ डझनापासून ६ डझनापर्यंत पेट्या भरल्या जातात. राज्यातील विविध बाजारपेठा तसेच गोव्यामध्ये आंबा विक्रीसाठी पाठविला जातो. यावर्षी वाशी बाजारसमितीमध्ये सुमारे ८० टक्के आंबा पाठविला. ऑनलाइन आणि थेट विक्रीच्या माध्यमातून आंब्याची विक्री करण्यात आली. दरवर्षी साधारणपणे २००० पेटी आंबा उत्पादन मिळते. - रजनीकांत वाडेकर, ९६०४६००५३९