शेतकरी : सुशांत मोहन नाईक गाव : वेतोरे, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग एकूण क्षेत्र : १२.५ एकर काजू क्षेत्र : ४ एकर माझी साडेबारा एकर जमीन आहे. यातील चार एकरांमध्ये वेंगुर्ला ४ जातीची काजूची पाचशे झाडे आहेत. उर्वरित पाच एकरांमध्ये आंब्याची ३०० झाडे आहेत. साधारणपणे १५ वर्षे वयाची काजू झाडे आहेत. मी बागेमध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांचा अजिबात वापर करत नाही. लागवडीनंतर सुरुवातीची ४-५ वर्षे काही प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला. मागील १० वर्षांपासून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने काजू उत्पादन घेत आहे. व्यवस्थापनातील बाबी
जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर बागेत मोठ्या प्रमाणात विविध वनस्पती आणि तणांची वाढ होते. बागेमध्ये वनस्पती आणि तण पूर्णपणे वाढू दिली जातात. जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व झाडांना ४ ते ५ किलो शेणखत दिले. बागेतील पालापाचोळा गोळा करून खड्ड्यात टाकला जातो. झाडाच्या बुंध्यावर कोणत्याही प्रकारचे तण आणि वनस्पती कापून टाकल्या जात नाहीत. बुंधा पूर्णपणे मोकळा ठेवला जातो. ऑगस्टमध्ये बागेत वाढलेल्या वेलवर्गीय वनस्पती ग्रासकटरने कापून बागेमध्ये पसरवून टाकले जाते. साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पालापाचोळा, तण कुजून त्याचे खत तयार होते. बागेतील रानमोडी मुळापासून उखडून टाकली जात नाही. तर ती पूर्ण वाढल्यानंतर ग्रासकटरच्या साह्याने कापून हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत बागेमध्ये दोन देशी गायी चरायला सोडल्या जातात. या गायींचे शेण, मलमूत्र बागेमध्ये पडते. त्याचा झाडांना फायदा होतो. बागेतील मित्रकीटकांचे संवर्धन होण्याकरिता बाग पूर्णपणे स्वच्छ केली जात नाही. काही प्रमाणात लहान झुडपे, गवत शिल्लक ठेवले जाते. साधारण ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर झाडांना नवीन पालवी येण्यास सुरुवात होते. त्यानंतर काही दिवसांनी मोहोर येतो. या काळात खोडकीड, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. किडींचा प्रादुर्भाव पाहून दशपर्णी अर्क, जिवामृताचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त इतर कोणतीही अनावश्यक फवारणी केली जात नाही. दरवर्षी बागेतून साधारण अडीच ते ३ टन काजू बी उत्पादन मिळते. त्यास साधारण १३० ते १४० रुपये प्रति किलो इतका दर मिळतो. काजू बी तयार होण्याच्या १५ ते २० दिवस अगोदर बागेत शिल्लक राहिलेले सर्व गवत काढून बाग पूर्ण स्वच्छ केली जाईल. साधारण जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून काजू बी परिपक्व होण्यास सुरवात होते. झाडावर पूर्ण परिपक्व होऊन जमिनीवर पडलेले काजू बी गोळा केले जाते. बाग पूर्णपणे स्वच्छ केल्यामुळे काजू बी जमिनीवर पडल्यानंतर खराब होत नाहीत. साधारण १५ मे पर्यंत काजूचा हंगामा सुरू असतो. फेब्रुवारी ते मे दरम्यान झाडांखाली पडलेला पालापाचोळा गोळा करून बुंध्यापासून काही अंतरावर त्याचे आच्छादन केले जाते. त्यामुळे उन्हाळ्यातील जास्त तापमानाचा झाडावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी होतो. पुढे पावसाळ्यात हा पालापाचोळा कुजून त्याचा झाडालाच फायदा होतो. - सुशांत नाईक, ९४०५१८४४७८