शेतकरी : गणेश श्यामराव नानोटे गाव : निंभारा, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला एकूण क्षेत्र : ५० एकर कापूस क्षेत्र : १० एकर सध्या माझे १० एकरावरील कपाशीचे पीक १०० ते १०५ दिवसांचे झाले आहे. पीक सध्या पाते लागणे ते बोंडे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. यावर्षी पावसाच्या असमतोलामुळे अपेक्षित फळधारणा झालेली नाही. त्यामुळे उत्पादनात १० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. उत्पादनावर जास्त परिणाम होणार नाही, या साठी प्रयत्न केले जात आहेत.
पिकाचे गुलाबी बोंड अळीसाठी वेळोवेळी निरिक्षण करत आहे. मागील आठवड्यात पोळ्याच्या अमावस्येअगोदर बोंडअळीचे काही पतंग आढळून आले. त्यामुळे पुढील दोन दिवसांत अळी आणि अंडी नाशकाच्या फवारणीचे नियोजन केले होते. मात्र, पोळ्याच्या रात्री झालेल्या वादळसदृश्य पावसामुळे नैसर्गिकरित्या नियंत्रण झाले. तसेच रसशोषक किडीचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. सध्या अपवादात्मक प्रमाणात डोमकळी दिसून येत आहे. ती हाताने नष्ट करीत आहे. नत्राचा योग्य वापर तसेच पिकामध्ये दाटी नसल्यामुळे बोंडसड देखील दिसून आली नाही. मागील ३ आठवड्यांपूर्वी एकरी ४ याप्रमाणात लावलेले पिवळ्या रंगाचे प्रकाश सापळे फायदेशीर ठरले आहेत. सततच्या पावसामुळे शेतातील काही भागात साचलेले पाणी शेताबाहेर काढले आहे. अद्याप तरी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. सध्या पिकावर पांढरी माशी वगळता इतर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. मात्र, सोयाबीन पीकदेखील ८० ते ८५ दिवसांचे झाले असून लवकरच त्याची पाने पिवळी पडतील. त्यामुळे सोयाबीनवरील पांढरी माशी कपाशीवर येण्याची शक्यता आहे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पाहून आवश्यक तीव्रतेच्या कीडनाशकाची फवारणी केली जाईल. सध्याचे वातावरण पाहता, पुढील काळात धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पात्यांची गळ होऊ शकते. आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी केली जाईल. बोंडे भरण्यासाठी आणि पाने लालसर होऊ नये यासाठी कीडनाशक, बुरशीनाशक, निंबोळी अर्क आणि पोटॅशिअम शोनाईट यांचा पुढील २ ते ३ दिवसांत वापर करणार आहे. सध्या शेतामध्ये तण दिसून येत आहे. त्यासाठी ३ ते ४ दिवसांत तणनाशकांचा वापर करणार आहे. लवकरच बोंडे फुटण्यास सुरवात होईल. त्यावेळी उंदरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. नियंत्रणासाठी बांधावर आणि बिळांजवळ विषारी आमिष तयार करून ठेवणार आहे. जमिनीलगतचे परिपक्व बोंड सततच्या पावसामुळे अद्याप खराब झाले नाही. मात्र, पाऊस असाच सुरू राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. - गणेश नानोटे, ९५७९१५४००४