उन्हाळी बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे आवश्यक असते. त्यासाठी साधारणपणे २ ते २.५ महिने पाणी तोडून पानगळ करून घ्यावी लागते. चांगला ताण बसण्यासाठी झाडांची ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पानगळ होणे आवश्यक असते. सीताफळ बागेत उन्हाळी बहार घेताना पाणी उपलब्धता असणे गरजेचे असते. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात फळबागांना पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा सीताफळ बागेत उन्हाळी बहर घेण्याकडे कल दिसत आहे. उन्हाळी बहर घेताना अधिक तापमान व उष्ण वारे यांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी उन्हाळी बहरातील बागेची छाटणी पूर्ण झालेली आहे. काही ठिकाणी शेतकरी छाटणी करण्याच्या तयारीत आहेत. या दृष्टीने बागेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ताण व्यवस्थापन
सीताफळाचा हंगाम संपल्यानंतर दर महिन्याला झाडांना पाणी दिले जाते. साधारणपणे १५ फेब्रुवारीनंतर पाणी देणे बंद केले जाते. साधारणतः १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल यादरम्यान बागेला ताण दिला जातो. बागेची १५ मार्चदरम्यान हलकी छाटणी करून घ्यावी. त्यानंतर प्रतिझाड १५ किलो शेणखत द्यावे. शेणखत दिल्यानंतर ताग किंवा धैंचा या हिरवळीच्या पिकांचे बियाणे पेरून घ्यावे. साधारणपणे एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता अधिक असते. हिरवळीची पिके घेतल्यामुळे बागेमधील जमीन जास्त तापत नाही. बागेतील ओलावा टिकून राहील. बागेतील तापमान कमी झाल्यामुळे कळीचे प्रमाण वाढते. फळधारणा चांगली होण्यास मदत होते. झाडाच्या खोडावर दीड फूट उंचीवर खोडाभोवती अडीच इंची चिकट टेप गुंडाळावे. त्यामुळे पिठ्या ढेकूण व त्यांची पिले झाडावर चढणार नाहीत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बागेस पाणी द्या. त्यानंतरच्या काळात झाडाच्या गरजेनुसार पाणी देण्यास सुरुवात करावी. उन्हाळी बहर धरताना घ्यावयाची काळजी
हा बहर धरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते. उन्हाळी बहरामध्ये आर्द्रता कमी झाल्यास फळधारणेवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा चांगली फुले लागतात, मात्र फळधारणा होत नाही. याचे मुख्य कारण बागेतील वाढलेले तापमान आणि कमी झालेली आर्द्रता असते. ताण देण्याचा काळ संपल्यानंतर बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. बागेत पडलेली काळी पाने, रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून नष्ट करावीत. बहर धरताना पानगळ झालेल्या बागेस पाणी द्यावे. त्यानंतर ७ ते १० दिवसांनी बहराची छाटणी करावी. बागेची छाटणी करताना जुन्या वाळलेल्या, अनावश्यक, दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडाचा मध्यभाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास सूर्यप्रकाश मिळेल. झाडाला सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास फळधारणा कमी होते. झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी. आर्द्रता कमी असलेल्या सीताफळ बागेत झाडाजवळ बाजरीसारखे पीक लावावे. यामुळे झाडाजवळ योग्य ती आर्द्रता राखण्यास मदत होते आणि फळधारणा वाढते. सीताफळ बागेमध्ये अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय निविष्ठांचा जास्त वापर करावा. यामध्ये शेणखत, शेणस्लरी व गोमूत्र यांचा वापर फायदेशीर ठरतो. शेणस्लरी मुळे जमीन भुसभुशीत होऊन झाडाला जास्त अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. तसेच फुलधारणा चांगली होऊन उत्पादनात वाढ होते. सीताफळाची फुलधारणा एप्रिल महिन्यापासून ऑगस्टच्या शेवटपर्यंत चालते. एका हंगामात सीताफळामध्ये साधारणपणे १५०० ते २ हजार फुले येतात. त्यापैकी १५० ते २०० फळधारणा होते. कीड व रोग नियंत्रण पिठ्या ढेकूण (फवारणी प्रतिलिटर पाणी)
झाडाच्या खोडावर १० ते १५ सेंमी रुंदीची प्लॅस्टिक पट्टी बांधावी. पट्टीच्या वरील बाजूस ग्रीस लावावे. त्यावर किडीची पिले चिकटून मरतात. सायंकाळच्या वेळी बागेत क्रिप्टोलिमस मॉट्रोझायरी (परोपजीवी कीटक) एकरी १००० ते १५०० प्रौढ भुंगेरे सोडावेत. व्हर्टिसिलिअम लेकॅनी (जैविक बुरशीनाशक) ४ ग्रॅम. गरजेनुसार ब्युप्रोफेझीन २ मिलि. फळसड रोगकारक स्थिती फळवाढीच्या काळात ढगाळ हवामान व पाऊस आल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. नियंत्रण
बोर्डो मिश्रण १ टक्का (चुना १०० ग्रॅम + मोरचूद १०० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फळे सुपारीच्या आकारापेक्षा मोठी झालेली असल्यास, आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. - डॉ. कैलास पालेपाड, ९६६५५१८६५१ (वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय, नेहरूनगर. जि. नांदेड)